Nana Patole: महाराष्ट्रात सातत्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देखील देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
“भाजपचे अनेक आमदार आमच्या सोबत आहेत. आम्ही जेव्हा हातोडा मारू तेव्हा तुम्हाला दिसेल. मात्र सध्या हा विषय महत्त्वाचा नाही. भारत जलाऊ पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र जाळण्याचे पाप केले. भाजपला महाराष्ट्र जाळण्याचा अधिकार नाही. भाजपचे जे विद्यमान आमदार, खासदार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असतील त्यांच्याबाबत वेळेनुसार निर्णय घेऊ ,” असे नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
लोणावळा येथे झालेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरामध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा, असे सांगितले आहे. “काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प करा. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो. भाजप जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपचा पराभव करावा लागणार आहे,” असेही नाना पटोले म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक विधान केले होते. ज्यानंतर काही काँग्रेस नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली. मात्र काँग्रेस नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. प्रणिती शिंदे यांनी मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता.