शब्दगंध साहित्य संमेलनात आ. जगताप यांना खा. विखेंचे पक्षप्रवेशाचे आवाहन
नगर – भाजपचे माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे पक्षात चांगलेच वजन निर्माण होऊन ते स्थिरावले असतांना त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट जाहिररित्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचे रविवारी निमंत्रण दिले. अर्थात संमेलनाचे सुप वाजल्यानंतर खुद्द आ. जगताप यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले.
शब्दगंध साहित्य परिषद व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमान आयुर्वे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या 15 व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी खा. डॉ. विखे यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी खा. डॉ. विखे यांनी हे निमंत्रण दिले.
खा. डॉ. विखे म्हणाले की, जिल्ह्याच्या उत्तर भागात साहित्याचे कार्यक्रम नियमितपणे होतात. पद्मश्री विखे यांच्या नावाने साहित्य पुरस्कार अनेक वर्षांपासून दिले जातात.
त्यानिमित्ताने अनेक साहित्यिक उपस्थित असतात. जिल्ह्याच्या दक्षिण भागात यशवंतराव गडाख यांच्यानंतर साहित्याचे कार्यक्रम आयोजित करणारे आमदार संग्राम जगताप एकमेव आहेत. आमदार जगताप यापूर्वी गरबा, दहीहंडी, गणेशोत्सव अशा कार्यक्रमात पुढाकार घेत होते. परंतु महायुतीच्या संपर्कात आल्याने ते आता साहित्याचे कार्यक्रम आयोजित करत आहेत.
अन्यथा गेल्या तीन वर्षात त्यांनी साहित्याचा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये बदल घडला. आता भाजपच्या संपर्कात आलेल्या आता आमदार जगताप यांनी माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह भाजपमध्ये यावे व साहित्याचा वारसा आणखी पुढे चालवावा, अशा शब्दात खासदार विखे यांनी पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले.
विखे व कर्डिले निघून गेल्यानंतर भारत राष्ट्र समितीचे घनश्याम शेलार यांनी नव्या व जुन्या भाजपमध्ये आता मोठा तफावत निर्माण झाली आहे, आमदार जगताप हे भाजपच्या संपर्कापेक्षा साहित्याच्या संपर्कात अधिक राहिले तर शहरात विकासात्मक बदलते घडू शकतील असा टोला लगावला. शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांच्यासह जिल्हाभरातील लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
शहरात वातानुकूलिन ग्रंथालय
येत्या 6 महिन्यात शहराच्या सावेडी उपनगरात, 25 कोटी रुपये खर्च करून वातानुकूलित ग्रंथालय माध्यमातून उभारले जाणार असल्याचे खा. डॉ. विखे यांनी यावेळी जाहीर केले. महापालिकेच्या जागेवर उभारले जाणारे हे ग्रंथालय उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे ग्रंथालय असेल असा दावा त्यांनी केला.