पिंपळे गुरव (संगीता पाचंगे ) – पिंपळे गुरव हा परिसर स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पवना नदी किनारी अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात पत्राशेड उभारून आदी व्यवसाय करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे येथील परिसराचा बकालपणा वाढत चालला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनधिकृत व्यावसायिकांचे पेव फुटले आहे. अशा अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळे गुरवमधील स्मशानभूमी ते मुक्तांगण लॉन्स येथील परिसरात पवना नदी किनारी अनधिकृतरित्या अनेक पत्राशेड उभारण्यात आले आहेत. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील परिसरात भंगार विक्रेते, पान टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रेते, मोटर गॅरेज, पार्किंग, झोपड्या आदी बिनधास्तपणे बेकायदेशीररित्या व्यवसाय करीत आहेत.
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून नागरिकांना पायी चालण्यासाठी रस्त्याच्या कडेला पदपथ, सायकल ट्रॅक तयार केले आहेत. मात्र, येथील भंगार विक्रेत्यांमुळे तसेच आदी व्यवसाय करणाऱ्यांमुळे येथील नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण होत आहे. येथील पथावर भंगार हातगाड्या, भंगार गोळा केलेली पोती, बॉक्सेसचे पुठ्ठे, मद्याच्या बाटल्या आदी चित्र पहावयास मिळते. तसेच बिनधास्तपणे दुचाकी, चार चाकी वाहने पदपथावरच पार्क करण्यात येत आहेत. याचा नाहक त्रास पायी चालणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पवना नदी किनारी तुळजाभवानी मंदिर, लक्ष्मीनगर, मंगल कार्यालय, सोसायटी, टोलेजंग इमारती असल्याने येथील परिसरात नदी किनारी अनधिकृत पत्राशेडमुळे परिसराला बाधा निर्माण होत आहे. तसेच दिवसेंदिवस बकालपणा ही वाढत चालला आहे. संबंधित महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील परिसरातील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई करून परिसर मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
कारवाईनंतर पुन्हा परिस्थिती जैसे-थे
गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून येथील परिसरात अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर धडक कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा येथील परिसरात जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे महापालिका, स्मार्ट सिटी येथील परिसरात विकासकामे, देखभाल दुरुस्ती याकडे लक्ष केंद्रित करीत आहे. मात्र महापालिका येथील परिसरातील पत्रशेडवर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर महापालिकेने कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सध्या मनुष्यबळ कमी असल्यामुळे कारवाईला अडचण येत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून ते काय निर्णय देतील त्यानुसार पुढील कारवाई निश्चित करू. अनेकदा येथील परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली गेली आहे. मात्र, पुन्हा व्यावसायिक पत्राशेड उभारून व्यवसाय करीत आहेत.
– अरुण सोनकुसरे, अतिक्रमण निरीक्षक.