नगर – जिल्ह्यात दहा दिवसात सर्वदूर पाऊस झाला. जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीच्या 92 टक्के पाऊस झाला. यात सहा तालुक्यात सरासरीच्या शंभर टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची टक्केवारी श्रीरामपूर तालुक्यात अवघी 47.2 टक्के झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सावच्या दुसर्यादिवश गुरूवार (दि.21) पासून पावसाला सुरूवात झाली. यात काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील पिकाला जीवनदायी ठरला आहे. या पावसाने रब्बी हंगामातील पिकांची सोय झाली. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकऱ्यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे.
जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून अनेक भागात दमदार पाऊस हजेरी लावत आहे. दक्षिणेतील नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी आणि उत्तरेतील अकोले तालुक्यात सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू असून सोमवारी कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जाताजाता पावसाने दमदार हजेरी लावली होती.
तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
नगर-110.1, पारनेर-116.3, श्रीगोंदा-110.6, कर्जत-92, जामखेड-91.3, शेवगाव-100.3, पाथर्डी-104.1, नेवासे-85.8, राहुरी-63.4, संगमनेर-81.8, अकोला-104.1, कोपरगाव-71.2, श्रीरामपूर-47.2, राहाता-72.8 तालुक्याच्या सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस.