सातारा – संपूर्ण लॉकडाऊन असताना सातारा पालिकेचे तब्बल साडेपाचशेहून अधिक कर्मचारी ऑन फिल्ड आहेत. मात्र, त्यांच्या आरोग्य तपासणीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या गंभीर विषयावर कामाच्या व्यस्ततेमुळे याबाबत पालिका प्रशासनाचे मौन कर्मचाऱ्यांना मात्र अडचणीचे ठरू शकते.सातारा पालिकेचे 271 आरोग्य क्रमचारी व इतर 280 कर्मचारी- अधिकारी असे साडेपाचशेहून अधिक कर्मचारी गेल्या पंधरवड्यापासून सातारा शहरातील “होम टू होम’ सर्वेच्या मोहिमेवर होते.
कर्मचाऱ्यांनी तीन आठवड्यांत शहरातील 26 हजार कुटुंबांशी संवाद साधत सुमारे एक लाख तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले. शहराच्या वीस प्रभागांत ही मोहिम प्रभावीपणे राबवण्यात आली. पथकामध्ये पालिका कर्मचारी, “एनयूएचएम’च्या परिचारिका, अंगणवाडी ताई, आशा वर्कर यांचा समावेश होता. या पथकांनी पुणे, मुंबईकरांनी प्रभावित क्षेत्रातील प्रत्येक घर पिंजून काढले. या कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर देण्यात आले.
मात्र, काही पथकांना केवळ लाईफ बॉय साबणांच्या वडयांवर भागवण्यात आले. सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात सॅनिटायझर स्वतःच्या पैशाने खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली. या अडचणींचा सामना करणाऱ्या कर्मचारी पथकांसाठी आरोग्य शिबिराचा विषय गेल्या तीन आठवडयांत एकदाही अजेंड्यावर घेण्यात आला नाही. सातारा शहरासह उपनगरांच्या सर्वेक्षणाचा व सुविधा पुरवण्याचा ताण पालिका कर्मचाऱ्यांवर पडला. लॉकडाऊनमुळे पाचशे कर्मचारी सक्तीने ऑन फील्ड आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याचा त्रागा कर्मचारी खासगीत व्यक्त करत आहेत.
उपाययोजना कागदावरच
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्या देण्यात आल्या. मात्र, इतकेच उपाय पुरेसे नाहीत तर पालिका कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबिरच घेण्याची मागणी होत आहे. कर्मचाऱ्यांचा ताप मोजण्यासाठी पालिकेने शासनाच्या इ पोर्टलवर थर्मल स्कॅनरची मागणी केली होती.
मात्र, स्कॅनरच अद्याप दाखल न झाल्याने सर्व उपाययोजना कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य शिबिरासाठी अनेक खासगी प्रॅक्टिशनर्सशी बोलणी केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आरोग्य शिबिराअभावी कर्मचारी रोजच्या कामांनी घाईला आले आहेत.