गेल्या काही वर्षांमध्ये चांद्रमोहिमांची संख्या वाढली आहे. सोबत मंगळ, शनीचे उपग्रह एन्सेलेडस आणि टायटन इथे जाण्यासाठी मोहिमांचे नियोजन सुरू आहे. आपली यानं किंवा छोटे प्रोब्स या ग्रहांच्या जवळ जातात, तिथल्या वातावरणात प्रवेश करतात, तर कधी तिथे प्रत्यक्ष उतरतातही. जपानचे हायाबुसा यान या वर्षी फेब्रुवारीमध्ये र्यू गू या अशनीवर उतरलं आणि त्याने तिथल्या खडकांचे नमुने गोळा केले.
या सगळ्या मोहिमांमधून एक गोष्ट स्पष्ट होते आहे. माणसांची यानं अवकाशातल्या या ठिकाणी काही ना काही प्रमाणात आपल्या खुणा सोडू शकतात. या खुणांनी त्या जागा दूषित करू शकतात. फेब्रुवारी 2018 मध्ये टेस्ला रोडस्टर ही स्पोर्टसकार स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन हेवी रॉकेटने थेट अवकाशात सोडून दिली. मानवी खुणा घेऊन ती कुठे कुठे जाईल? इस्रायलचे खासगी यान बेरशीट या वर्षी चंद्रावर आदळले. त्यातले सामान इतस्तत: विखुरले गेले असण्याची दाट शक्यता आहे आणि या सामानात काही मानवी डीएनए आणि टार्डीग्रेड या अतिसूक्ष्म जीवांचे काही नमुने होते. याचा अर्थ, चंद्रावर आता मूळची चंद्राची म्हणून जी काही वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती होती, ती तशी राहणार नाही?
दुसरीकडे आपण चंद्र आणि मंगळ इथे मानवी वसाहती उभारण्याची मनीषा बाळगत आहोत. अशा वेळी या नवीन प्रदेशात जाताना काही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे असावीत की नाही? नासाने अवकाशमोहिमांना प्रारंभ करताना आपणहून काही बंधने घालून घेतली होती. त्यानंतर 1967 साली मान्य झालेल्या आउटर स्पेस ट्रीटीनुसार कायदेशीररीत्या कोणत्याही देशाला किंवा खासगी कंपन्यांना अवकाशात कुठेही शस्त्र किंवा अण्वस्त्र ठेवता येत नाहीत. आज मात्र खासगी मोहिमा सुरू होत आहेत. अवकाशाचे अर्थकारण बदलत आहे. त्यामुळे नासाने अलिकडे नव्या तत्त्वांची आखणी करण्यासाठी एक बैठक बोलावली होती.
त्यातून काही गोष्टी पुढे येत आहेत. या ग्रहांवर किंवा अवकाशातल्या वस्तूंवर काहीएक भाग हा संशोधनाकरता वेगळा राखून ठेवावा. विश्वात जीव कसे जन्माला आले, ते वेगवेगळ्या परिस्थितीत कसे वाढतात, कसे तग धरतात, कसे उत्क्रांत होत जातात याचा अभ्यास तिथे करता येईल. तसेच या राखीव जागेत मूळ ग्रहाच्या जडणघडणीवर संशोधन करता येईल. माणसांनी वसाहतीची सुरुवात करतानाच निसर्गाचा समतोल राखणे आणि संवर्धन करणे याकडे लक्ष द्यावे लागेल.
हळूहळू या तत्त्वांचा सखोल विचार करून काही दीर्घकालीन कायदे अस्तित्वात येतील. नव्या ग्रहांवर जाताना त्यांचे काटेकोर पालन करावे लागेल. अवकाश कुणा एका देशाच्या मालकीचे नसले, तरी तिथे काय होते आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीवर आणि एकूणच अवकाशावर काय दूरगामी परिणाम होऊ शकतात, याची जबाबदारी आपली
सर्वांची आहे.
विज्ञानविश्व
डॉ. मेघश्री दळवी