नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोनाच्या संबंधात राष्ट्राला उद्देशून जो संदेश दिला आहे त्याबद्दल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींचा हा संदेश केवळ प्रतिकात्मक कृती करण्याचे आवाहन करणार आहे, त्यात करोनामुळे उद्भवलेल्या आव्हानांबद्दल कोणतेही सुतोवाच नाही.
आज गरिबांची जगण्याची लढाई गंभीर बनली असून त्यांना पंतप्रधानांकडून काही मदत जाहीर होण्याची अपेक्षा होती. मंदीचे आव्हान रोखण्यासाठीच्या काही उपाययोजना अपेक्षित होत्या. पण पंतप्रधानांनी दोन्ही बाबतीत लोकांना निराश केले आहे. चिदंबरम यांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे की, आदरणीय पंतप्रधान येत्या 5 एप्रिलला दिवा लावण्याचा आपला संदेश आम्ही ऐकू पण त्याच्या बदल्यात तुम्ही करोना नियंत्रणात आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेवर उपाययोजना करण्यासाठी या क्षेत्रातील हुशार माणसांचेही सल्ले ऐका.
आज देशातील व्यावसायिकांपासून रोजंदारीवर काम करणारा प्रत्येक महिला आणि पुरुष पंतप्रधान अर्थव्यवस्थेला चालना देणारे काहीं महत्वाचे निर्णय सांगतील या अपेक्षेत होते. अशा प्रसंगात प्रतिकात्मतेला महत्त्व असतेच; पण त्याचवेळी गंभीर उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या आणि आवश्यक असतात, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.