शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेऊन पूजा, आरती केली. नंतर अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाची हेलिकाॅप्टरमधून पाहणी करून जलपूजन करण्यात आले. तसेच धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डीजवळील काकडी गावातील भव्य सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, भाषण करताना मोदी यांनी अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
मोदी म्हणाले – शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?
‘2014 च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटी मारावे लागत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं मात्र 2014 नंतर हे चित्र बदललं. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं. महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपी वर धान्य खरेदी केले परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले.
हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर शोक व्यक्त –
ज्येष्ठ किर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. देशातील अनमोल रत्न वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांच्या वैकुंठगमनाचे दुखद बातमी समजली. त्यांचे आदरपूर्वक बोलणे, वाणीची शैली त्याचा प्रभाव आम्ही पाहिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते- शिंदे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली होती. तर, विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते असा खोचक टोला शिंदे यांनी लगावला आहे. शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना शिंदे यांनी ही टीका केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असतांना शिंदे यांनी ही टीका केली आहे.
मोदी यांनी महाराष्ट्रात सिंचनासाठी 30 हजार कोटी रुपये दिले -फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सिंचनासाठी 30 हजार कोटी रुपये दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही सिंचनाची कामे पूर्ण करु शकलो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. निळवंडेसारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार यांच्याकडून मोदींचे तोंडभरून कौतुक –
साईबाबांनी येथील जनतेला सुख दुःखावर मात करण्याची शक्ती दिली. त्याचबरोबर सबका मलिक एक असं सांगत येथील जनतेला जगण्याचा मूलमंत्र दिला. तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सबका साथ सबका विकास या घोषणेच्या माध्यमातून मागील दहा वर्षात देशाला बळकट करण्याचे काम केले आहे. आजही याच घोषणेच्या माध्यमातून देशात विकास होत आहे. शिर्डीच्या साईमंदिरात लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. जसा साईबाबा भक्तांना दिशा दाखविण्याचे काम करतो, येथील मंदिरात आल्यानंतर भाविकांना नवीन ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन देशाच्या नागरिकांमध्ये होत आहे. साईबाबानी ‘सबका मलिक एक’ असा संदेश दिला. याच संदेशांच्या पावलावर पाऊल ठेवत पीएम मोदी यांनी देशाला सबका साथ सबका विकासाचा नारा दिला. या नाऱ्यातून मागील दहा वर्षात देशात विकासाची गंगा वाहिली आहे. याच घोषणेच्या मार्गाने देशाचा विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाआधी अजित पवार यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली.