नवी दिल्ली : मागच्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. दोन समुदायातील हिंसाचाराचे परिणाम आता पूर्ण देशात पाहायला मिळत आहेत. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर हा हिंसाचार जगासमोर प्रखरपणे आला आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांच्या INDIA या आघाडीने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव देखील विरोधक संसदेत मांडणार आहेत या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्याच एका नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाचा घरचा आहेर देत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. मात्र हे करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मणिपूर प्रकरणावरून टीका करताना शर्मा यांनी, “मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया विनोद शर्मा यांनी दिली आहे.
VIDEO | “I have resigned from BJP with a heavy heart. Manipur situation has defamed India,” says BJP leader Vinod Sharma after resigning from the party over Manipur issue. pic.twitter.com/QUwhrG92Tx
— Press Trust of India (@PTI_News) July 27, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच विनोद शर्मा यांनी आपल्या पक्षालाही लक्ष्य केले आहे. “भाजपा नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का? एक माणूस म्हणून मी हे सगळं सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे”, असे विनोद शर्मा म्हणाले.
मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात देशभर व्हायरल झाला. दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या या व्हिडीओमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. मात्र, घटनेच्या दोन महिन्यांनंतर मोदी त्यावर व्यक्त झाले, त्यातही संसदेत न बोलता फक्त माध्यमांसमोर त्यांनी भूमिका मांडल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला आहे.
मणिपूरमध्ये अंतर्गत सामाजिक असंतोषामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच खुद्द भाजपचे नेतेच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि मणिपूर घटनेच्या अयोग्य हाताळणीवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे हे विरोधकांना आयते कोलित मिळाले असल्याचे म्हटले जात आहे.