विधानसभेत हे पक्ष स्वतंत्र लढले तर मातब्बरांना फटका बसण्याची चिन्हे
– रोहन मुजूमदार
पुणे – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित विकास आघाडी फॅक्टरचा सर्वाधिक फटका कॉंग्रेसला तर काहीसा राष्ट्रवादीला बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा काबीज करण्यासाठी कॉंग्रेस वंचितला जवळ करीत आहे तर तरुणांमध्ये “क्रेझ’ असलेला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न असफल झाले अन् हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर जवळपास सर्वच पण सर्वाधिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणित बिघडेल अन् मातब्बरांना फटका बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड, दौंड, हवेली-पुरंदर, हवेली-शिरूर, बारामती, इंदापूर या मतदारसंघात मातब्बरांची फौज मोठी आहे. त्यात सर्वाधिक इच्छुकांची फौज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तर त्या खालोखाल शिवसेनेत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत जिल्ह्यात राष्ट्रवादी व थोडीफार मोठी “उलथापालथ’ होण्याची चिन्हे गडद झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्यांना किंवा विधानसभा निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांमधील मातब्बरांना “वंचित’, “मनसे’ आपल्या “गोटात’ सहभागी करून घेण्यास किंवा या पक्षाद्वारे आपली ताकद दाखवण्यासाठी इच्छुक वंचित, मनसेमध्ये स्वत:हून सहभागी होऊ शकतो. ज्या विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होणार आहे, त्या ठिकाणची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कार्यकर्त्यांमध्येही तीन गट पडण्याची शक्यता आहे.
एक म्हणजे त्या नेत्याला मानणारा, दुसरा त्या नेत्याला न मानणारा आणि तिसरा गट फक्त पक्ष आदेश मानणारा, याचा फटका सर्वाधिक त्या-त्या पक्षालाच बसणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष “मांजर’ पावलांनी आतातरी खेळी करीत असले तरी अनेक मातब्बर आतापासून “दबावतंत्रा’चा वापर करीत असल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण
झाला आहे.
वंचित फॅक्टर चालणार नाही?
आगामी विधानसभेत “वंचित’ स्वतंत्र लढला तर त्यांच्या “फॅक्टर’चा बोलबाला असेल असे बोलले जात आहे; मात्र हीच वंचित आघाडी फुटली असून त्यांचे दोन पक्षांत विभाजन झाले आहे. लक्ष्मण माने यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून विधानसभेत राष्ट्रवादीबरोबर लढण्याचे पहिलेच जाहीर केले आहे; मात्र प्रकाश आंबेडकर अद्यापही नमते न घेता आपल्या भूमिकेवर अडून बसले असल्याने आघाडी होण्याची शक्यता धूसरच असल्याने ते सध्यातरी स्वतंत्र लढणार हे जरी गृहित धरले तरी पक्ष फुटल्यामुळे हा “फॅक्टर’ विधानसभेत जाणवणार नसल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
मनसेकडून राष्ट्रवादीला मिळणार “गिफ्ट’?
महाराष्ट्रातील जवळपास सर्व विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार उभा करेल, अशी भूमिका पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांचा “लाव रे तो व्हिडीओ’ची प्रचंड “क्रेझ’ निर्माण झाली होती; मात्र त्यांनी उमेदवार उभा न केल्याने ते “फेल’ गेले. त्यामुळे आगामी विधानसभेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि युतीशी दोन हात करण्यासाठी मनसेला आघाडीच्या “कुबड्यां’ची आणि “लाव रे तो व्हिडीओ’च्या पुढील “व्हर्जन’ची गरज आहे. त्यातच राष्ट्रवादी त्यांना गळाला लावण्यास उत्सुक असून राजही शरद पवार यांच्याबरोबर जाण्यास आतातरी अनुकूल दिसत आहेत. मनसे स्वतंत्र लढली तरी ते राष्ट्रवादी विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेण्याची चिन्हे अधिक आहेत. हे सत्यात उतरले तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगलाच दिलासा मिळू शकतो. पण या जर-तरच्या गोष्टी आहेत.