मेढा – मेढा नगर विकास आराखड्यावरून वातावरण तापले असताना या प्रस्तावित आराखड्याला स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नगरविकास सचिवांना तशा सूचना केल्या असून नगरपंचायतीकडून चार दिवसांत प्रस्ताव गेल्यावर या विकास आराखड्याला स्थगिती मिळणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मेढा नगरपंचायतीचा प्रस्तावित नगर विकास आराखडा, वाढीव करआकारणी व नवीन बांधकामे कायम करण्यावरून शहरातील वातावरण तापले होते. यावर चर्चा करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांची बैठक बोलावली होती. बैठकीला तहसीलदार राजेंद्र पोळ, मुख्याधिकारी अमोल पवार, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार,माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, नगरसेवक शशिकांत गुरव, विकास देशपांडे, नारायण देशमुख, संतोष वारागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांनी या बाबींचे राजकीय भांडवल केल्याचा आरोप करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “”हा आराखडा मेढ्याच्या विकासासाठी करण्यात आला आहे. याच्यात कोणी राजकारण करू नये. कोणावरही अन्याय, जबरदस्ती केली जाणार नाही.
सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल. मेढ्याचा विकास आराखडा होणारच. पण जे चुकीचं झालं असेल तेवढं बदलण्यात येईल. साताऱ्यात आमच्या जागेवरही आरक्षण पडलं आहे. आम्ही छत्रपती किंवा आमदार खासदार आहोत म्हणून आमच्या जमिनी वाचल्या नाहीत. तरीसुद्धा या ठिकाणी कोणावरही मी अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून नगर विकास खात्याच्या सचिवांना या विकास आराखड्याला स्थगिती देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.” राजकारण करणाऱ्या विरोधकांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी चांगला समाचार घेतला. विकास कामे मी मंजूर करून आणायची आणि हे म्हणतात यात आमदारांचा काय संबंध, मग विकास कामे काय आभाळातून आपोआप पडतात का,असे प्रश्न करून त्यांनी “मला पण राजकारण करता येतं.
मी कोणाचा मिंधा नाही. ज्यांना डावपेच करायचेत त्यांनी पुढे निवडणूक आहे, त्यात करा. बघू मग,’ अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला. विकास आराखड्याला आधी स्थगिती येऊ द्या, त्यानंतर एक एक विषय आपण समन्वयाने सोडवू, अशी हमी त्यांनी दिली. यावेळी किसनराव जवळ, विलासबाबा जवळ, सुरेश पार्टे, बबनराव जवळ, सचिन करंजेकर, प्रशांत करंजेकर, सचिन जवळ, श्रीमती गोरे आदींनी आपल्या व्यथा शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पांडुरंग जवळ, अनिल शिंदे, विकास देशपांडे, नारायण देशमुख व विलासबाबा जवळ, सचिन करंजेकर, सचिन जवळ, किसन जवळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.