सांगवी, दि. 9 (वार्ताहर) – जुनी सांगवी गावठाणानजीक पवना नदीपात्राची सीमाभिंत तोडून राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. हा राडारोडा साफ करून तेथे वाहनतळ बनविण्याचे नियोजन आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला माहिती देऊनही महापालिका प्रशासनाला एवढ्या गंभीर विषयावर स्थळपाहणी करायला वेळ मिळालेला नाही. या ठिकाणी दररोज राडारोडा टाकण्यात येत आहे. याकडे महापालिका आयुक्तांनीच लक्ष देऊन ही सीमा भिंत पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
जुनी सांगवी येथील पवना नदी पात्रालगतच्या वेताळ महाराज मंदिराजवळ राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब स्थानिकांनी आणून दिली आहे. परंतु महापालिका प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राडारोडा टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून काम थांबविले असते तर पुन्हा येथे शेकडो ट्रक राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचे काम संबंधिताकडून झाले नसते. महापालिका प्रशासन काहीच करत नसल्याने नदीपात्राची सीमाभिंत तोडून तेथे टाकलेला राडारोडा सपाट करून तेथे सध्या वाहनतळ बरविण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. परंतु महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही याकडे गांभीर्याने बघत नसल्याची परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाने येथील राडाराडा बाजूला करून सीमाभिंतीचे काम पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाला गेल्या आठवड्यात पत्र देऊन हे काम थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू केलेली दिसत नाही. महापालिका अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करायलाही अद्याप वेळ मिळालेला नाही. त्यामुळे या ठिकाणची सीमाभिंत पूर्ववत न झाल्यास किंवा राडाराडा काढून बाजूला न केल्यास विधानसभेत तारांकित प्रश्न करावा लागेल, तसेच हरित न्यायालयातही आपण धाव घेणार आहोत.
– राजू सावळे, शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
बारा वर्षांपूर्वीही ‘प्रभात’च्या वृत्तामुळे थांबला होता प्रकार
विशेष म्हणजे याबाबत दैनिक प्रभातने 2010 मध्ये आवाज उठविल्याने त्यावेळी खडबडून जागे होऊन महापालिका प्रशासनाने सीमाभिंतीची उंची वाढवून या ठिकाणी कारवाई संदर्भात सूचना फलक लावला होता. मात्र, पुन्हा या ठिकाणी राजरोसपणे चार चाकी वाहनाचे पार्किंग सुरू होत आहे. या ठिकाणची सीमाभिंत तोडून दररोज ट्रक वर ट्रक राडाराडा आणून टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.