संगमनेर – महाविकास आघाडी सरकारच्या काळात, सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सरकारने ही मान्यता द्यायला पाच महिने उशीर केला. त्यामुळे लाभ क्षेत्रातील कामे रखडली. उशिरा का होईना, सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार. आता तरी निळवंडेच्या विरोधकांनी लाभधारक शेतकऱ्यांच्या वाटेत विघ्न आणू नये, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे यांना लगावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गतिमान झालेले निळवंडे कालव्यांचे काम शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर खोळंबले होते. मंत्रिमंडळ बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे निळवंडे कालव्यांचे काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला. यासंदर्भात माजी मंत्री थोरात यांनी सरकारचे अभिनंदन केले. भविष्यात तरी निळवंडे कामांच्या कालव्यात विघ्न आणू नका, असेही सुनावले.
थोरात म्हणाले, 2014 ते 2019 या भाजप सरकारच्या काळात निळवंडे कालव्यांचे काम रखडले होते. 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यानंतर पुढच्या अडीच वर्षात रखडलेल्या कामाला गती देण्याबरोबर निळवंडेच्या कालव्यांच्या कामात अडथळे ठरू पाहणारे विषय दूर करता आले याचे मला समाधान आहे. आज निळवंडे प्रकल्पाचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झालेले आहे.
धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडणे हा एक अत्यंत अवघड टप्पा होता. धरण ते कालवा यांच्यामध्ये असलेल्या डोंगराला बोगदा पाडून त्यातून कालव्यामध्ये पाणी सोडायचे होते, तो अवघड टप्पा ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि विक्रमी वेळेत पूर्ण झाला.
याशिवाय प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले पुनर्वसन, शिवाय त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या शेत जमिनीसाठी बारमाही पाण्याची सोय करणे, ही कामे मूळ प्रकल्पाबाहेरची होती. काही ठिकाणचे भूसंपादन राहिलेले होते. कालव्यांमुळे लोक वस्तीकडे जाणारे रस्ते बंद झालेले होते, कालव्यांवर पूल बांधणे अपेक्षित होते. ही सर्व वाढीव कामे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात वेगाने पूर्ण करण्यात आली. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वेळोवेळी या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करून दिली.
यापुढे देखील प्रकल्प पूर्ण करताना अनपेक्षित खर्च वाढू शकतात, त्या वाढीव खर्चाला देखील सरकारने वेळच्यावेळी मंजुरी देत रहावी, तरच आजच्या प्रशासकीय मान्यतेच्या मंजुरीला अर्थ राहील. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतरही मी सांगितले होते की, कोणी कितीही विघ्न आणले तरी निळवंडेचे काम अडवू शकणार नाही, ती बाब आज स्पष्ट झाली. मात्र, न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा आटापिटा पालकमंत्री महोदयांनी लावला आहे. जनतेच्या मनात कितीही संभ्रम निर्माण केला तरी जनतेला सत्य काय ते माहीत आहे. पुढील काळात निळवंडे कालव्यांच्या कामात विघ्न आणले नाही, तरीसुद्धा लाभधारक शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे होईल, असाही टोला थोरात यांनी नामोल्लेख टाळत मंत्री विखे यांना लगावला.