नवी दिल्ली – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी त्यांना एक तरूण सापडल्याचे मान्य केले असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. अरूणाचलमधील एका तरूणाचे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी अपहरण केल्याचा आरोप भाजपाचे खासदार तापीर गाओ यांनी समाज माध्यमांद्वारे केला होता.
त्याच्या छायाचित्रांवरून त्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने सुुरू केली आहे. त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया त्यानंतर सुरू होईल. यासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
या बेपत्ता तरूणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने पीएलएशी आपल्या प्रस्थापित हॉटलाईन यंत्रणेद्वारे संपर्क साधला होता. त्या युवकाची माहिती देऊन लाकूडफाटा गोळा करताना आणि शिकार करताना त्याची वाट चुकल्याचे सांगून त्यांच्या भागात त्याचा शोध घेऊन सापडल्यास आचारसंहितेप्रमाणे परत देण्याची विनंती केली होती.
अरूणाचल पूर्वमधील खासदार गाओ यांनी या घटनेचे वर्णन “भारतीय हद्दीतून केलेले अपहरण’ असे केले होते. त्याच्या मित्राने त्याची सुटका करून घेत प्रशासनाला त्याची माहिती दिली आहे. भारत सरकारच्या सर्व संबंधितांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. या ट्विटला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय लष्करासह अनेकांना टॅग केले होते.
या घटनेनंतर राजकीय वादंगही निर्माण झाले होते. या मुद्द्यावर पंतप्रधानांनी मौन बाळगल्याबद्दल राहूल गांधी यांनी टीकेची झोड ऊठवली होती. त्यांना याची फिकिर वाटत नसल्याचे राहूल गांधी यांनी नमूद केले होते.