देशाच्या निवडणूक इतिहासात कदाचित अशी पहिली घटना असेल की निवडणूक प्रचारातून गायब असणारा, तोंडी माघार घेणारा चक्क विजयी झाल्याची. श्रीगोंदा मतदारसंघात हा चमत्कार 1972 च्या निवडणुकीत घडला होता. हा इतिहास घडवणारे उमेदवार होते बाबुराव महादेव भारस्कर. या निकालाची नोंद तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती.
1962 व 67 च्या निवडणुकीत भारस्कर यांनी बाजी मारली होती. केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या शिफारशीनुसार ते राज्यात पाच वर्षे समाजकल्याण खात्याचे मंत्री देखील होते. भारस्कर यांचे मंत्रिपद जिल्ह्यातील मातब्बरांना रुचत नव्हते. त्यांनी कोणतेही कारण नसताना 1972 च्या निवडणुकीत भारस्कर यांना उमेदवारी नाकारण्यासाठी श्रेष्ठींचे कान भरले. अपरिचित प्रभाकर शिंदे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. भारस्कर यांनी अर्ज भरला. मात्र तो वेळेत मागे घेता आला नाही. भारस्कर यांनी निवडणूक प्रचारातून अंग काढून घेतले. तसेच प्रभाकर शिंदे यांना तोंडी पाठिंबा जाहीर केला. शिंदे भारस्कर व वाकोबा ओहोळ (आरपीआय) असे तिघेजण रिंगणात होते. शिंदे यांचा विजय सर्वांनी गृहित धरला होता. मात्र भारस्कर यांना उमेदवारी नाकारण्याचा श्रेष्ठींचा निर्णय तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रुचला नाही. या मुद्द्यावर पक्षात दोन गट पडले.
स्वातंत्र्यसैनिक बाबुमिया बॅंडवाले, डॉ. रूपचंद ताडे, आबासाहेब लगड, खासेराव वाबळे आदी नेते कॉंग्रेस उमेदवार शिंदे यांच्या प्रचारात सक्रियपणे उतरले. दुसऱ्या बाजूने कि. बा. झेंडे, अहिलू पाटील, गुंगानाना धालवडे, कांतिलाल भंडारी, विठ्ठलराव मोटे पाटील, गुलाबराव आमले पाटील, रावसाहेब येरकळ, ऍड. बाबासाहेब फडणीस, मुरलीधर होनराव या मंडळींनी भारस्कर यांना निवडून आणण्याचा चंग बांधला. स्वतः भारस्कर मात्र प्रचारात फिरले नाही. नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये ते निवडणूक काळात मुक्कामी होते.
कार्यकर्त्यांकडे एक वाहन होते. ते ऍड. फडणीस यांनी दिले होते. कांतिलाल भंडारी यांचे दुसरे वाहन काहीकाळ प्रचारात होते. बाकी कार्यकर्ते सायकलवर प्रचार करीत. भारस्कर यांना सायकल चिन्ह मिळाले होते. निवडणूक झाली. सर्वांना गाय-वासरू विजयी होण्याची अपेक्षा होती. निकाल लागला भारस्कर यांच्या बाजूने. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भारस्कर यांना विश्वास बसेना. कॉंग्रेसच्या शिंदेना 15 हजार 152 मते मिळाली होती. भारस्कर यांना 19 हजार 853 मते मिळाली. ओहळ यांना एक हजार 884 जणांनी पसंती दिली. तीन हजार 861 मतांनी भारस्कर विजयी झाले. माघार घेतलेल्या उमेदवाराने कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव कसा काय केला, याचा रिपोर्ट इंदिरा गांधींनी मागविला. पुढे भारस्कर यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला; मात्र त्यांचे मंत्रिपद हुकले अन् राजकीय कारकिर्दीस ओहोटी लागली.
शंभर रुपये खर्चून जिंकली निवडणूक
1972 ला भारस्कर यांचा निवडणूक खर्च होता अवघा शंभर रुपये. तो देखील लोकवर्गणीतून केला गेला. कार्यकर्ते भाकरी बांधून प्रचाराला निघत. झाडाखाली वामकुक्षी घेत. सायंकाळी चुरमुरे किंवा भेळ भत्ता मिळे. एक ट्रक प्रचारात होता. त्याच्या पुढच्या बाजूला श्रीगोंद्यातील दोन पाटील (विठ्ठलराव मोटे व गुलाबराव आमले) बसत. निवडणूक प्रचाराच्या या आठवणींना ज्येष्ठ नेते मुरलीधर होनराव यांनी ‘प्रभात’कडे उजाळा दिला.