वाराणसी – राहुल गांधींच्या विमानाला सोमवारी वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर उतरण्याची परवानगी खोडसाळपणे नाकारण्यात आली असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.कॉंग्रेस नेते अजय राय म्हणाले की विमानतळ प्राधिकरणांनी दबावाखाली राहुल गांधी यांच्या विमानाला परवानगी दिली नाही. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचा ‘निमित्त’ म्हणून वापर केला.
ते म्हणाले की, राहुल गांधी यांचे विमान सोमवारी रात्री वाराणसी विमानतळावर उतरणार होते, परंतु “जाणूनबुजून” परवानगी देण्यात आली नाही. भाजप सरकार राहुल गांधींना घाबरले आहे आणि म्हणूनच त्यांनी विमानाला वाराणसीच्या विमानतळावर उतरू दिले नाही असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केल्यापासून देशाचे पंतप्रधान चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे ते राहुल गांधी यांना अशा प्रकारचा त्रास देत आहेत. राहुल गांधी हे सोमवारी रात्री वाराणसीत येणार होते आणि आज श्री काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना करणार होते.