नवी दिल्ली: बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मायावती यांनी भारत आणि एनडीए या दोन्ही आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे. बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याद्वारे त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाल्या मायावती?
बसपा प्रमुख म्हणाले की, “आमचा पक्ष कोणत्याही युतीमध्ये सामील होणार नाही. आमचा पक्ष एकटाच लोकसभा निवडणूक लढवतो कारण आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व दलिताच्या हातात आहे.आघाडी केल्याने पक्षाला फायदा कमी, नुकसानच जास्त होतं आणि आमच्या मतांची टक्केवारी देखील कमी होते सोबतच इतर पक्षांना फायदा होतो. म्हणून इतर पक्षांना बीएसपीला सोबत घेऊन निवडणूक लढवायची असते. 2007 प्रमाणे आमचा पक्ष लोकसभेतही चांगले निकाल देईल.”
पुढे त्या म्हणाल्या, “आघाडीमध्ये बीएसपीची सर्व मते आघाडीला मिळतात पण आघाडीची मते, खासकरून उच्चवर्णीयांची मते बसपाला मिळत नाहीत. युती करून निवडणुका लढल्याने बसपचे नुकसान होते. देशातील बहुतांश पक्षांना बसपासोबत एकत्र निवडणूक लढवायची आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांनी चांगले निकाल आणले तर ती माझ्यासाठी भेट असेल.”
यावेळी मायावती यांनी आजकालचे सरकार नावं बदलण्यात आणि घोषणा करण्यात व्यस्त आहे. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसून भाजप, काँग्रेसची तत्वनिष्ठ आणि जातीयवादी विचारसरणी आहे. केंद्र आणि राज्य सरकार धर्म आणि संस्कृतीचे राजकारण करत आहे आणि त्यामुळेच लोकशाही कमकुवत होत असल्याची टीकाही केली.