शरद पवार ः मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून सत्कारानंतर मिश्किल टिपण्णी
बारामती-मी राजकारणातून निवृत्ती घेणार, असे अनेकांना वाटत होते; मात्र राज्यातील जनतेने आणि तरुण वर्गाने तसे घडू दिले नाही. राज्यातील जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असल्याचा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विरोधकांना लगावला.
ऍग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ‘कृषिक-2020’ प्रात्याक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रसिद्ध अभिनेते आमिर खान, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आंतराष्ट्रीय धोरणकर्ते (इस्राईलचे सल्लागार दूत) डॅन अलुफ, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, धिरज देशमुख, बबनराव शिदे यांच्यासह व राज्यातील बहुतांशी विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने शरद पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीलाच ते म्हणाले या दोघांनी संयुक्तरीत्या माझा सत्कार केला म्हणजे मी निवृत्ती घ्यावी, अशी यांची इच्छा दिसते. राज्यातील अनेकांना वाटले होते की, मी आता निवृत्ती घेणार; परंतु राज्यातील जनतेने, विशिष्टकरून तरुण वर्गाने तसे घडू दिले नाही. असा टोला पवार यांनी लगावताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
पवार म्हणाले, जगाची शेती बदलत आहे. भारतातही लोकसंख्या खूप वाढत आहे. यामध्ये शेती हे महत्वाचे क्षेत्र असून देशातील शेतीतही बदल केला पाहिजे. नवनवीन संशोधन केले पाहिजे. केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. सरकारने देखील महत्त्वपूर्ण पावले उचलणे गरजेचे आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शेती संदर्भात विविध संशोधन होत आहे. वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग येथे राबविले जात आहेत. हे शेतीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
- आमिर खान घेणार शेतीचे धडे
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सिनेअभिनेता आमिर खान यांनी कृषी विज्ञान केंद्रातील शेती विषयक प्रयोगांचे कौतुक केले. दोन ते तीन दिवस मुक्काम करून कृषी विज्ञान केंद्रातील शेती विषयाचे धडे घेण्यास मला आवडेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध भागात केलेल्या कामासंदर्भात आमिर खान विचारणा करण्यात आली. त्यास उत्तर देत असताना शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात अजूनही खूप काही करण्याची गरज असल्याचे मत आमिर खान यांनी व्यक्त केले.