manoj jarange patil : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( maratha reservation ) मुद्दा दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ठाम असून, अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यातच मनोज जरांगे पाटील ( manoj jarange patil ) यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर आता स्वतः मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असं सरकारने म्हटले होते. पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार नाही.
मला अटक करायची असेल तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल..’ अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत.
त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय शिंदे समिती रद्द करण्याची मागणीही छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकारण या दोन नेत्यानं भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे.