Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीपासून अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी निघणार आहेत. ते 26 जानेवारीला मुंबईत दाखल होतील. मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
पण मनोज जरांगे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अश्या परिस्थितीत आज आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषेदत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘मी मॅनेज होत नाही हे तुमचं (सरकार) दुखणे आहे. पूर्वीचा मराठा राहिला नाही, आता देशव्यापी आंदोलनाची मागणी आहे. शिष्टमंडळाचा देखील आता कंटाळा आलाय’, असे जरांगे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “सरकार आम्हाला धोका देत आहे, पण सरकारला आम्ही भ्रमात ठेवणार आहे. आम्ही खूप सावध आहोत. आम्ही आता गनिमी कावाने मुंबईला पोहचवून आंदोलन करणार आहे. फोन आला नाही म्हणून नका, स्वतः होऊन पुढे या आणि आंदोलनात सहभागी व्हा..! असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहेत.
ते पुढे म्हणाले, सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होत आहे. सरकार असंच वागत राहीलं तर आम्ही तुमचा सुपडा साफ करू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. प्रशासनाचे अधिकारी जाणूनबुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आता 20 जानेवारीला मुंबईला जाणार म्हणजे जाणारच, थांबणार नाही. असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
असा असणार मुंबईला जाण्याचा मार्ग :
20 जानेवारी पहिला मुक्काम – बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम – (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 मुक्काम – आझाद मैदान आंदोलन स्थळी