Manoj Jarange-Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत चालला असल्याचे दिसत आहे. कारण सरकारला देण्यात आलेली वेळ संपत आली आहे तरीदेखील कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange-Patil) पाटील हे उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सोबतच पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जालन्यातील आंतरावली सराटी गावामध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्री, खासदार, आमदार यांना राज्यभर गावबंदी करण्यात येईल, असा इशारा देत बुधवारी उपोषणास बसताना आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे जरांगे(Manoj Jarange-Patil) यांनी म्हटले आहे त्यासोबतच २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक जिल्ह्यातील ‘सर्कल’ च्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. २८ ऑक्टोबरपासून या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात केले जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात ‘मेणबत्ती फेरी’ काढण्यात येईल. आंदोलनाचा पहिला टप्पा सरकारला झेपणारा असला तरी दुसरा टप्पा पेलवणारा नसेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी(Manoj Jarange-Patil), “सरकारकडून आमचीच माणसे आमच्या विरोधात उतरविण्यात येत असून त्याबद्दल आपणास बोलावयाचे नाही, कारण मराठा आरक्षण हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमचे आंदोलन शांततेचे होणार आहे, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या नादी लागू नका आणि त्यांच्या भावनांशी खेळू नका. कारण आरक्षण हा त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही आत्महत्या करू नये. तर माझ्या खांद्याला खांदा लावून लढावे. मरण्यापेक्षा लढून आपण जातीला न्याय देऊ शकतो, “असे आवाहन जरांगे(Manoj Jarange-Patil) यांनी केले.
तर दुसरीकडे मी कधीही कुणाला खोटे आश्वासन दिलेले नाही, कोणाची फसवणूक केलेली नाही आणि कधी करणारही नाही. माझ्या राजकीय आयुष्यामध्ये आतापर्यंत मी दिलेला शब्द पाळला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.