पळसदेव – शेतकऱ्याला पिकविण्याची कला आहे; मात्र पिकवलेला माल विकण्याची कला आवश्यक आहे. जगात रेशीम मागणीच्या केवळ 20 टक्के उत्पन्न होते. त्यामुळे रेशीम व्यवसायायाला आणखी पुढील पन्नास वर्षे भीती नाही. कितीही क्षेत्र वाढलं तरी मार्केटची गरज पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे सध्या रेशीम व्यवसायाला सोन्याचे दिवस आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरु करायला हरकत नसल्याचं मत रेशीम शेती तज्ञ विजय बालगुडे यांनी व्यक्त केलं.
पळसदेव येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद भिगवण व पवार चॅरिटेबल ट्रस्ट पळसदेव यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत रेशीम शेती या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बालगुडे बोलत होते. या वेळी बॅन ऑफ महाराष्ट्राचे प्रभारी अधिकारी उमेश निकम, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, बॅंक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक मनोज भोसले, सरपंच अजिनाथ पवार, उपसरपंच कैलास भोसले, ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे, स्वप्नील काळे, मेघराज कुचेकर, महेंद्र काळे, कृषी सहायक गणपत खांडेकर, सोसायटीचे चेअरमन शंकर मोरे, पोलीस पाटील अप्पा बांडे, माजी उपसरपंच प्रवीण काळे, देवा फलफले, पवार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रामदास पवार यांसह शेतकरी उपस्थित होते.
कमी खर्चात व कमी धोक्याचा व्यवसाय म्हणून या व्यवसायाची ओळख आहे. शिवाय कमी भांडवलात अधिक नफा देणारा हा व्यवसाय आहे. फक्त शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बनवून या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. यासाठी निचरा होणारी जमीन अधिक लाभायदायक असते. लागवड केल्यावर 20 वर्षे चालते. सबसिडीसाठी हा व्यवसाय करू नका. फक्त खत आणि पाण्याचं गणित जमलं तरच शेती होईल.
पिकाची उत्पादन क्षमता वाढणार. रासायनिक खताचा वापर करण्याची आवश्यकता नाही. शेणखत, मळी याचा वापर करा. कमीत कमी उत्पादन खर्चात ही शेती होते. व्ही1 जात लागवड करावी, एकरी साधारणतः 5 हजार रोपांची लागवड 5 फूट बाय 3 फूट या अंतरावर करावी. म्हणजे नंतर मशागतीस देखील सुलभता होईल.