Manohar Joshi Passed Away। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज पहाटे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
मनोहर जोशी यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास पाहिला तर तो थक्क करणारा आहे. अगदी शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करणारे नेते म्हणून जोशी सरांकडे पाहण्यात येत होतं. मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मुंबईचे महापौरपद, राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदे भुषविली होती.
मनोहर जोशींनी दिला राजीनामा Manohar Joshi Passed Away।
राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता. राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली होती. 1995 शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. यानंतर मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द ऐन भरात असताना १९९९ साली मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडण्याची वेळ आली होती. मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप झाला होता. हेच मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदावरुन गच्छंतीचे निमित्त ठरले.
हेही वाचा
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला ! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
मातोश्रीवरुन बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश येताच जोशी सरांनी मुख्यमंत्रीपद सोडलं
मनोहर जोशी जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणतीही खळखळ न करता बाळासाहेब ठाकरे यांच्या एका पत्रावर आपले पद सोडून दिले. तु्म्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या, असा मोघम मजकूर या पत्रात लिहला होता. मातोश्रीवरुन आलेला हा आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
राजीनामा दिल्यानंतर मनोहर जोशी काय म्हणाले? Manohar Joshi Passed Away।
मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपले मुख्यमंत्रीपद एका क्षणात सोडले होते. यानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कोणतेही किल्मिष नव्हते. मुख्यमंत्रीपद गेल्याबद्दल त्यांना नंतरच्या काळात प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटले की, 1999 साली एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला.
1995 साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाल्याचे मनोहर जोशी यांनी सांगितले होते.