सोलापूर – हितेश वळूंज व प्रदीप दाढे यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीसमोर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान महाराष्ट्राने मणिपूरला पहिला डाव अवघ्या १३७ धावांवर गुंडाळला. दिवसातील उर्वरीत खेळात महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात ३ गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत. आता ते केवळ १४ धावांनी पिछाडीवर आहेत.
Stumps Day 1: Maharashtra – 123/3 in 32.3 overs (S A Veer 58 off 102, K M Jadhav 49 off 66) #MAHvMAN #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 5, 2024
मणिपूरच्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार केदार जाधव ४९ धावांवर खेळत आहे. तर सिद्धेश वीर ५८ धावांची खेळी करुन परतला. केदारच्या जोडीला अंकित बावणे खेळपट्टीवर असून त्याला अद्याप खाते घडायचे आहे. मणिपूरकडून विश्वजित कोंथुजमने सर्वाधिक २ बळी मिळवले.
मणिपूरचा कर्णधार लांग्लोयाम्बा केशंबबाम याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्राच्या वळुंज व दाढे यांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवताना कमालीची भेदक गोलंदाजी केली. या जोडीने त्यांचा डाव सावरूच दिला नाही. के प्रीज्योत सिंगने ४५, प्रफुल्लमणी सिंगने ३३ तर बशिर रेहमान १९ यांनाच केवळ दोनअंकी धावा करता आल्या. वळूंजने ५तर दाढेने ४ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – मणिपूर पहिला डाव – ५४.१ षटकांत सर्वबाद १३७ धावा. (के प्रीज्योत सिंग ४५, प्रफुल्लमणी सिंग ३३, बशिर रेहमान १९, हितेश वळूंज ५-३३, प्रदीप दाढे ४-३५). महाराष्ट्र पहिला डाव – ३२.३ षटकांत ३ बाद १२३ धावा. (सिद्धेश वीर ५८, केदार जाधव खेळत आहे ४९, अंकित बावणे खेळत आहे ०, विश्वजित कोंथुजम २-४१).