श्रीकांत कात्रे
दुष्काळी भागातील शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून संसार चालविणेजिकिरीचेच असते. त्यामुळे शेतीला पूरक असा काही व्यवसाय करणे भाग पडते. अगदी शेतीपूरक व्यवसाय करणे शक्य झाले नाही तरी कोणता तरी जोडव्यवसायकरून हातपाय हलविणे भाग पडते. शोभा रणदिवे यांनीही असाच संघर्ष करीत आपली प्रगती साधली. शेतीबरोबरच किराणा दुकान सुरू करून अडथळ्यांवर मात करीत त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळवून दिली…
सिन्नर तालुक्यातील सोंडी हे तसे दुष्काळी गाव. शोभा रणदिवे यांनाही थोडी शेती. पण फक्त शेतीवर उदरनिर्वाह करणे तसे कठीणच. बाजरीसारखे एखादे पीक मिळाले
तरी भरपूर अशी परिस्थिती. अलिकडील काळात विहिरीचे पाणी उपलब्ध होऊ शकत असल्याने आता काही प्रमाणात मका, सोयाबीन, हरभरा किंवा गव्हासारखे उत्पन्नही मिळू लागले आहे. तरीही केवळ शेतीमधील उत्पन्नावर प्रपंचाला पुरेसे पाठबळ मिळत नाही. नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य असलेले नांदूर मधमेश्वर हे त्यांचे माहेर. त्यांचे वडीलही शेती करायचे. त्यामुळे शेतीत काम करण्याची त्यांना सवय होती. लग्नानंतर सोंडी येथे आल्यावर त्यांचे शेतीमधील काम सुरू झाले.
नांगरणी, पेरणी, औषध फवारणी, तण- गवत काढणे अशी शेतीतील कामे त्या करू लागल्या. पण शेती थोडी असल्याने आणखी काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात येत असायचा. मात्र, मुले लहान होती. पावसाळ्यात बाजरीसारखे पीक व्हायचे. पूर्वी दुष्काळामुळे पिकांना मर्यादा असायच्या. नंतर परिसरात एकत्रितपणे विहिरी काढण्यास सुरवात झाली. त्यावेळी त्यांच्या दिरांसमवेत सामायिक विहिर काढल्यामुळे सोयाबीन, हरभरा, गहू यासारखी पिकेही त्या घेऊ लागल्या. तरीही आर्थिक उत्पन्नावर मर्यादाच होत्या. त्यामुळे मुले मोठी झाल्यावर पतीच्या मदतीने आणखी काही करण्याचा विचार सुरू होता.
त्यावेळी गावाची गरज त्यांनी लक्षात घेतली. एखादी काड्यापेटी घ्यायची किंवा छोटी वस्तू घ्यायची तर गावात दुकान नव्हते. ही गोष्ट लक्षात घेऊन असं दुकान सुरू करायचे त्यांनी ठरविले. सुरवातीला शाळेतील मुलांसाठी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे असे पदार्थ दुकानांत ठेवून व्यवसायाला सुरवात झाली. हळूहळू किराणा मालाची विक्री सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला. किराणा किंवा इतर माल आणण्यासाठी सुरवातीला त्यांना बाहेर जाऊ लागल्या. मात्र, आता विविध कंपन्यांच्या गाड्या गावात येऊन दुकानासाठी माल देऊ लागला आहे. दुकानामुळे त्यांच प्रंपचाला आर्थिक हातभार मिळू लागला. गावात ऊसतोड मजूर येऊ लागल्यामुळे दुकानाचा प्रतिसाद वाढला.
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शोभा रणदिवे यांचा माणदेशी फाउंडेशनशी संपर्क झाला होता. घरासमोरील रस्त्यावरून माणदेशीची बस जात असे. खेडेगावातून अशी बस गेली म्हणजे सर्वांनाच उत्सुकता असायची. मग अधिक चौकशी केल्यावर ही संस्था महिलांसाठी काम करते, प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविते अशी माहिती मिळाली. शोभा यांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले. मुलीला ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले. गावातील इतर महिलांनीही असेच प्रशिक्षण घेतले. शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले तरी आता इतर व्याप वाढल्यामुळे त्या आता शिवणकाम करत नाहीत.
माणदेशीने प्रोत्साहन दिल्यामुळे शेती, दुकान, शेळीपालन असे काम वाढविण्यासाठी त्यांना दिशा मिळाली. त्याशिवाय गावातील मराठी शाळेत मदतनीस म्हणून त्या काम करू लागल्या. त्यांच्याकडे एक म्हैस आहे. काही शेळ्या आहेत. त्यातूनही काही उत्पन्न मिळते. हे सारे आहे. त्यामुळे त्यांना आता दिवसही पुरत नाही. घरकाम, चारापाणी करून शेती, दुकान सांभाळत दुपारचा वेळेत शाळेत पोषण आहार तयार करून मुलांना खाऊ घालणे, नंतर डिश धुणे व स्वच्छता करणे नंतर पुन्हा दुकानात थांबायचे, असे बाराही महिने कष्टाचे. हा सारा प्रवास सांगताना त्यांना आठवतो संघर्ष. दुकान सुरू करताना झालेला विरोध, घर चालविण्यासाठी केलेली मोलमजुरी. या संघर्षात पतीने साथ दिली. एकमेकांना दिलेल्या साथीमुळे फायदा झाल्याचे त्या सांगतात. पण या कष्टाचे आता चीज झाले, असे त्यांना वाटते.
त्यांच्या दोन मुलांपैकी एकाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. दुसरा बारावीत शिकत आहे. मुलगी अकरावीत आहे. त्यांना चांगले शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या सर्व कामाच्या व्यापातून अडीच वर्षांपासून महिला बचत गटाचेही त्या काम करतात. आपल्याप्रमाणेच इतर गरजू महिलांनीही प्रगती सादावी, असे त्यांना वाटते. ग्रामीण भागातील महिला संघर्ष करीत आपल्या कुटुंबासाठी झगडत असतात. एकमेकींचा विचार करतात. त्यापैकीच शोभा. त्यांनी जिद्दीने आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी केलेली धडपड ही आदर्शवतच ठरावी अशी आहे.