नवी दिल्ली – भारत जगाचे औषध उत्पादनाचे केंद्र बनला आहे. आगामी काळातही भारतामध्ये हा उद्योग विकसित होण्यास मोठा वाव आहे असे केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मंडावीया यांनी म्हटले आहे. औषधी स्टार्ट अप् या विषयावरील गुंतवणूक शिखर परिषदेत बोलताना मंडवीया म्हणाले की भारताने फक्त औषध क्षेत्रातच नाही तर इतर सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
भारतातील औषधी उद्योग आगोदरच विकसित झाल्यामुळे या उद्योगाला सरकारच्या धोरणाचा फायदा करून घेण्याची चांगली संधी आहे. जगातील औषध उद्योगांनी आणि गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी. त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहील. त्याचबरोबर त्यांना या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.
भारताने उत्पादन आधारित अनुदान योजना जाहीर केली आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होण्यास मदत मिळणार आहे. भारत देशातील गुंतवणूकदार आणि परदेशातील गुंतवणूकदार असा भेदभाव करीत नाही. अनुदान योजनेअंतर्गत आतापर्यंत 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विविध प्रकल्पात झाली आहे.
करोनाच्या काळामध्ये करोनावर उपयोगी पडणारी औषधे भारताने 150 देशांना निर्यात केली आहेत. त्याचबरोबर आगामी काळात भारतात मोठ्या प्रमाणात लसीची निर्यात करणार आहे. भारतातील औषधी उद्योगांचे वेगळेपण सांगताना मंडवीया म्हणाले की, भारतामध्ये औषधी या क्षेत्रावर प्राचीन काळापासून संशोधन आणि विकास चालू आहे. केवळ औषध निर्मिती म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जात नाही तर यामध्ये भावना गुंतविल्या जातात असे त्यांनी सांगितले.
करोनाच्या काळामध्ये इतर क्षेत्रापेक्षा औषधी उद्योग जोमाने वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी या क्षेत्राकडे भरपूर पैसा आहे. याचा उपयोग करून घ्यावा आणि निर्यात वाढवावी असे त्यांनी सांगितले. भारतात लोकशाही आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. त्याचबरोबर अतिशय पारदर्शक व्यवस्थापन असल्यामुळे भारतामध्ये उद्योग स्थापन करून ते विकसित करण्यात कसलीही अडचण येत नाही. त्यामुळे 2020 मध्ये या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक 98 टक्क्यांनी वाढली आहे तर निर्यात 18 टक्क्यांनी वाढली आहे.