नवी दिल्ली – हरित क्रांतीनंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. एवढेच नाही तर कृषी उत्पादनाची भारतातून निर्यात होते. यामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे असे कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले.
हरित क्रांतिअगोदर भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. त्यामुळे परकीय चलन खर्च करून अन्नधान्याची आयात करावी लागत असे. मात्र हरित क्रांतीनंतर भारतामध्ये अन्नसुरक्षा निर्माण झाली आहे. कृषी क्षेत्रातील महिलांच्या स्टार्ट अप वरील परिसंवादात बोलताना चौधरी यांनी सांगितले की, फक्त शेतीमध्येच महिलांचा मोठा वाटा नाही, तर कृषी उत्पादनावरील प्रक्रिया, विक्री या क्षेत्रातही महिला काम करत आहेत.
त्याचबरोबर आता संरक्षण अंतराळ संशोधन क्रीडा आणि व्यवस्थापन या क्षेत्रातही भारतीय महिला वेगाने आगेकूच करीत आहेत. भारतामध्ये महिला कृषी उत्पादकांचे गट नेमले जात आहेत. त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातूनही महिला कृषी उत्पन्न आधारित छोटे उद्योग सुरू करीत आहेत.
कृषी क्षेत्रातील एकूण रोजगारात महिलांचा वाटा मोठा आहे असे त्यांनी सांगितले. मशागत, पेरणी, पॅकेजिंग या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा वाटा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आता कृषी विद्यापीठातील महिलांची संख्याही वेगाने वाढत असल्याचे ते म्हणाले. महिलांचा विकास झाल्याशिवाय कोणत्याही देशाचा सर्वसमावेशक विकास होत नाही.
जे विकसित देश आहेत त्या ठिकाणी महिलांचा विकास विकास झालेला आहे. त्यामुळे भारताला विकसित देश व्हायचे असेल तर महिलांचा विकास पुरुषाच्या बरोबर होण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. देशामध्ये बचत गटाची चळवळ फोफावली आहे. बॅंका या बचत गटांना चांगली मदत करीत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये बचत गट हे अर्थव्यवस्थेचे महत्वाचे अंग होईल असे त्यांनी सांगितले.