नवी दिल्ली – भारतासारख्या विविध वर्गाच्या देशांमध्ये सर्वसमावेशक विकास झाला तरच हा विकास शाश्वत स्वरुपाचा ठरेल असे रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. मलसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राजन यांनी सांगितले की, एकाच वर्गाचा विकास झाला आणि इतर वर्गाचा विकास झाला नाही तर त्यामुळे सामाजिक शांतता टिकू शकत नाही. त्यासाठी सर्व वर्गाचा सर्वसमावेशक विकास करणारे धोरण तयार करण्याची गरज आहे.
अर्थव्यवस्थेवरील विश्वास मंदावत असल्याची भीती राजन यांनी व्यक्त केली. करोना येण्याअगोदर अर्थ व्यवस्थेवरील विश्वास कमी झाला होता. विकास दर मंदावला होता. मात्र करोनानंतर परिस्थिती आणखी बिघडली. बरेच मध्यमवर्गीय लोक आता दारिद्रयरेषेच्या खाली गेले आहेत. या परिस्थितीत वेगाने सुधारणा करून अर्थव्यवस्थेवरील विश्वास पुनरुज्जीवित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये सध्या शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती प्रतिबिंबित होत नाही. समाजाच्या सर्व वर्गांमध्ये आत्मविश्वास कमी झाल्याची भावना निर्माण झाली आहे. यावर्षी रिझर्व बॅंकेने अगोदर विकासदर साडेदहा टक्के होईल असे म्हटले होते. मात्र त्यानंतर रिझर्व बॅंकेने यामध्ये सुधारणा करून विकासदर साडेनऊ टक्के राहील असे म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेने चांगले रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची गरज आहे. मात्र स्थानिक ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादावर परिणाम होत आहे.
हा प्रकार केंद्रीय पातळीवर व राज्य पातळीवरही होत असल्यामुळे समाजामधील एकोपा कमी होत असल्याचे राजन यांनी सांगितले. भारताने आत्मनिर्भर धोरणांतर्गत जागतिक व्यापाराकडे दुर्लक्ष करू नये. जागतिक व्यापार करार जास्तीत जास्त प्रमाणात केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यास मदत होईल. अर्थ व्यवस्थेबरोबरच लोकांच्या मानवी हक्काच्या संवर्धनाबाबत भारताने जागृत राहण्याची गरज आहे.