हिंजवडी – हिंजवडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील आयटी पार्क फेज 2 कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क जवळील एका मॉलचे सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व विहिरीत उतरत असल्याने शेतीचे व पर्यायाने निसर्गाचे नुकसान झाले आहे.
या भागातील शेतीतील विहिरीत पाणी झिरपल्याने पाण्यावर तरंग येत असून या दूषित पाण्याच्या दुर्गंधीमुळे या परिसरातील 20 पेक्षा अधिक कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. हिंजवडीत नव्याने सुरू झालेल्या संबंधित मॉलच्या व्यवस्थापनाने सांडपाणी सोडण्याची अधिकृत व्यवस्था न केल्याने हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी येथील शेतकरी हरिभाऊ वाघमारे यांच्या शेतात पसरले आहे. यामुळे त्यांच्या विहिरीचे पाणीही दूषित झाले असून हे पाणी प्यायल्याने म्हशीचा मृत्यूही झाला आहे.
सांडपाण्यामुळे गहू व भातपिकाचे नुकसानही झाले आहे. शेताजवळ असलेल्या नाल्यातून सांडपाणी खुले वाहत असल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील अनेक कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मॉलच्या दुषित पाण्यामुळे कूपनलिका व विहरीची पाणी दुषित झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी हिंजवडी ग्रामपंचायतीसह गाव कामगार तलाठ्याकडे केली आहे, असे भाऊसाहेब वाघमारे यांनी “प्रभात’शी
बोलताना सांगितले.
संबंधित मॉलकडे सांडपाण्याची चौकशी केली असून मॉलच्या व्यवस्थापनाने दोन दिवसात ते बंद करण्यात येईल, असे सांगितले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील या भागात भूमिगत गटार वाहिनी करण्यात येईल.
– विशाल साखरे, सरपंच, हिंजवडी.
ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नसल्याने आम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल साखरे यांच्याकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांनी तत्काळ या भागाला भेट देऊन दूषित पाण्याची पाहणी केली.
– भाऊसाहेब वाघमारे.