– अनिल काटे
वाई – वाई तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले असून गावागावांतील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत. मागील निवडणूक व तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद पाहता यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. तर भाजपची भूमिका अजून गुलदस्त्यात असून आघाडीमधील कॉग्रेस व शिवसेना मित्र पक्षांची वाटचाल अनभिज्ञ असल्याने तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच एकहाती वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे संकेत आहेत.
वाई तालुक्यातील गावोगावी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत. आ. मकरंद पाटील यांचा गावोगावी, तळागाळातील वाडीवस्तीवरील जनसंपर्क पक्षाची व कार्यकर्त्यांची जमेची बाजू आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गावोगावी दुफळी असली तरी अंतिम क्षणी आ. पाटील यांचा शब्द प्रमाण असल्याने सर्व काही राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडून नेहमी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यास मदत होते.
माजी आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजप प्रवेशानंतर तालुक्यात भाजपची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीदरम्यान कमळ प्रत्येक गावोगावी पोचले आहे, हे नाकारून चालणार नाही, मदनदादाना मानणारा कॉंग्रेस कार्यकर्ता तालुक्यातील खेडोपाडी आता भाजपचा कार्यकर्ता झाला आहे. त्यामुळे भाजपला ग्रामीण भागात नवसंजीवनी मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपची भूमिका गुलदस्त्यात असली तरी जुन्या व नव्या दम्याच्या कार्यकर्त्यांचे सूत अजून जुळलेले दिसत नाहीत. जुन्या कार्यकर्त्यांना पक्षातील निवडी व कार्यक्रमात सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप खासगीत होत असल्याने याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे गावोगाव भाजपचे कमळ फुलले असले तरी राष्ट्रवादी पक्षाच्या तुलनेत भाजपमध्ये कार्यक्षम नेतृत्वाचा अभाव, जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळ बसणे अवघड समजले जात आहे. साहाजिकच भाजपला ही निवडणूक तितकीशी सोपी नाही. तरीही बावधन, केंजळ, गुळुंब, सुरूर, उडतारे, ओझर्डे, खानापूर, देगाव, पसरणी, शेंदूरजणे, लोहारे,मांढरदेव, शिरगाव, चिखली, धोम, मुगाव या महत्वाच्या राजकीय संवेदनशील ग्रामपंचायतींमधील सक्षम कार्यकर्ते राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार आहेत. भाजप, कॉग्रेस, शिवसेना यांची तालुक्यातील राजकीय बांधणी व ताकद पाहता “24 तास रिचेबल’ आमदार मकरंद पाटील यांच्या जनसंपर्कामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वरचढ आहे, हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही.
नेतृत्त्वाअभावी शिवसेना आणि कॉंग्रेस दिशाहिन
मदन भोसले भाजपमध्ये गेल्यानंतर कॉग्रेस पक्ष नेत्याविना दिशा हरवून बसला आहे. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी कॉग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. मात्र, सक्षम नेतृत्व नसल्याने पक्ष कार्यकर्ता दिशाहीन झाला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होऊनही कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांची काहीच हालचाल दिसत नाही. कॉग्रेस कार्यकर्ते भक्कम व सक्षम नेतृत्वाच्या शोधात आहेत. तीच परिस्थिती शिवसेना पक्षाची असल्याने सध्याच्या परिस्थितीत कॉग्रेस व शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणुकीचा सामना करणे अवघड असल्याने सत्तेत सामील होण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी धर्म पाळावा लागणार आहे. अन्यथा सत्तेपासून दूर राहवे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.