नवी दिल्ली – पंजाब, हरियाणा व राजस्थानमधील शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ अंदोलनाच्या पार्श्वभूमिवर या तिन्ही राज्यांच्या सिमांवर पोलिस व शेतकऱ्यांमधील चकमकींमुळे तणाव कायम आहे.
त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गृह मंत्रालयाने आता पंजाबवर कडक कारवाई केली असून राज्यातील तीन जिल्ह्यांतील तसेच हरियाणातील बंद केलेली इंटरनेट सेवा १७ फेब्रुवारीरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पंजाब सरकारने गृह मंत्रालयाला पत्र लिहून यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
माहिती न देता असे पाऊल उचलणे नियमांच्या विरोधात असल्याचे पत्रात लिहिले आहे. सध्या सरकार व अंदोलक यांच्यात चर्चेच्या बैठकी चालू असून त्यातून कुठलाही तोडगा निघत नसल्याने या सिमांवरील तणाव निवळण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.
गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतर पंजाब सरकारने आक्षेप नोंदवून इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने पंजाबमधील पटियाला, फतेहगढ साहिब आणि संगरूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे.
शतरणा, सामना, घनौर, देवीगड, पटियालाचे बलबहेरा, खनौरी, मोनक, लेहरा, सुनम, संगरूरचे छजली आणि संपूर्ण फतेहगड साहिब जिल्ह्यात इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान शेतकऱ्यांच्या भेटीसाठी सिमेवर दाखल झाले आहेत.