कोल्हापूर (प्रतिनिधी) – परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली.
साके (ता. कागल) येथे अतिवृष्टीने भात पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन ज्ञानदेव पाटील मारुती पाटील आदी शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भुईमूग, झेंडू आदी पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाईसाठी त्वरीत अहवाल पाठवणे बाबत सूचना दिल्या.
ते पुढे म्हणाले, परतीचा पावसाने अतिवृष्टी स्वरूपात यावर्षी हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील भात, भुईमूग, सोयाबीन, मिरची, झेंडू या काढणीस आलेल्या पिकांचे जिल्ह्यात सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काढणीस आलेली हजारो एकर क्षेत्रातील पिके अक्षरशः कुजली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घर व इतर मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामे युद्धपातळीवर करावेत. या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी. असेही ते म्हणाले.
यावेळी कृषी अधिकारी अरविंद पाटील, विस्ताराधिकारी सुरेश कुंभार, ग्रामसेविका सुनिता पुरेकर ,कृष्णात पाटील, तलाठी सुनील भातमारे ,संतोष पवार, दयानंद कांबळे, उत्तम पाटील, प्रताप पाटील, हिंदुराव पाटील, शहाजी पाटील, अविनाश पाटील, सुधीर पाटील, दिनकर वाडकर, नामदेव बल्लाळ, आदी उपस्थित होते
शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावेत…
गतवर्षीचा महापूर, जागतिक महामारी कोरोनाचे संकट, वीज दरवाढ, कर्जमाफीसह व्याज सवलत मधील घोळ, या संकटाच्या मालिकेत आत्ताच्या अतिवृष्टीची भर पडली आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्याला दसरा- दिवाळीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावेत. असेही घाटगे म्हणाले .