पुणे -हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. तसेच सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैनात केल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.
विधानभवन येथे परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यंत्री पवार यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इत्यादी मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बदलत्या हवामानानुसार पडणाऱ्या पाऊसाची नोंद घेत विभागातील परिस्थितीबाबत प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे करण्याची कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.