Maharashtra Winter Season : राज्यासह देशात तापमानात मोठीघाट झाली असून त्याचा परिणाम म्हणजे थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान,काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे. परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे. राज्यातील वर्षाअखेरपर्यंत असेच तापमान राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली गेले आहे.विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगला घसरला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम होताना दिसत आहे. आता काही दिवस तापमानात घट होताना दिसेल. 25 डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.