महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. येत्या काही दिवसांमध्ये मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येईल. देशातील इतर केंद्रीय मंडळांनी घेतलेल्या परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत करोना महामारीमुळे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जो बिघाड झाला होता तो बिघाड आता दुरुस्त झाला असून शैक्षणिक व्यवस्था हळूहळू मार्गी लागत आहे, हाच या निकाल प्रक्रियेचा अर्थ आहे.
यापूर्वी जेव्हा करोना महामारी उच्चस्तरावर होती तेव्हा दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यापासून निकाल लागण्यापर्यंत सर्वच व्यवस्था अडचणीत आली होती. परीक्षा ऑफलाइन घ्यायची का ऑनलाइन, विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयामध्ये परीक्षेसाठी बोलवायचे का, प्रत्यक्ष शिक्षण द्यायचे का ऑनलाइन, असे अनेक प्रश्न गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत निर्माण झाले होते. त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जेव्हा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला प्रारंभी विरोध झाला असला, तरी मंडळाचा निर्णय योग्यच होता आणि शिक्षण व्यवस्था मार्गावर आणण्यासाठी तो महत्त्वाचा होता, असेच आता सिद्ध झाले आहे.
दहावी किंवा बारावी हे कोणाच्याही शैक्षणिक आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचे टप्पे असतात. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत दहावी आणि बारावी परीक्षा घेण्यासाठी आणि निकाल लावण्यासाठी उशीर लागल्यामुळे अनेक प्रवेश परीक्षांच्या तारखा लांबल्या होत्या. बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जी प्रवेश परीक्षा द्यावी लागत होती तीसुद्धा खूप उशिरा झाली. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षही उशिरा सुरू झाले होते. अनेक महाविद्यालयांमध्ये सध्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम सेमिस्टरही अद्याप पूर्ण झालेले नाही. साधारणपणे प्रवेशपरीक्षा प्रक्रिया जुलै-ऑगस्टमध्ये संपते; पण गेली दोन वर्षे ती डिसेंबर-जानेवारीपर्यंत चालू राहिली होती. महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे दुसरे सेमिस्टर जेव्हा संपायला हवे होते तेव्हा प्रथम सेमिस्टर सुरू झालेले आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. बारावीच्या निकालावर पुढील सर्व गोष्टी अवलंबून असल्याने आणि मागील कालावधीत दहावी-बारावीचे निकाल रखडले असल्याने त्याचा खूप फटका बसला होता. पण या वर्षी बारावीचा निकाल वेळेत लागला असल्याने आगामी शैक्षणिक व्यवस्थेलाही शिस्त लागेल, अशी आशा करायला हवी.
येत्या काही कालावधीत अनेक व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया होणार आहेत. प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पाडून शैक्षणिक व्यवस्था आणखी मार्गावर आणण्याची जबाबदारी आता या प्रवेश परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर आली आहे. बारावीचा निकाल वेळेवर लागल्यामुळे जरी सर्व शैक्षणिक व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी त्याच वेळी बारावीच्या निकालाचे प्रमाण पाहता प्रवेशाची नवीन समस्याही निर्माण होण्याचा धोका लक्षात घ्यायला हवा. ज्या प्रमाणात विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत तेवढ्या प्रमाणात त्यांना आगामी शिक्षणासाठी जागा उपलब्ध आहेत का, याचाही विचार करावा लागणार आहे. सर्वसाधारणपणे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकीला किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. या व्यतिरिक्त नेहमीचे जे परंपरागत कला, वाणिज्य आणि विज्ञानविषयक अभ्यासक्रम आहेत त्यासाठी प्रवेश घेतले जातात.
विद्यार्थ्यांची विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी असलेली मागणी आणि या मागणीसाठी असलेला पुरवठा हा नेहमीच विषम असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा दरवर्षी सरकारतर्फे करण्यात येत असली, तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळत नाही हे वास्तवही नाकारून चालणार नाही. म्हणूनच आता सरकारच्या शिक्षण विभागाने आणि प्रमुख शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रबोधनाचा विचार करायला हवा. बारावीनंतर इतर किती संधी उपलब्ध आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना द्यायला हवी. अनेक लोकप्रिय अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना इतर अनेक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी फिरकतही नाहीत आणि त्या अभ्यासक्रमांचे वर्ग पूर्णपणे भरतही नाहीत, हे याठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. यावर्षी आगामी शैक्षणिक व्यवस्था मार्गी लागायची असेल तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतही योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
बारावीच्या निकालाची आणि प्रवेशाची यंत्रणा गेल्या दोन वर्षांमध्ये बिघडली असल्याने त्याचा थेट परिणाम महाविद्यालयीन शिक्षणावरही झाला होता. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी यावेळी ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याने महाविद्यालयीन शिक्षणही सुरळीत होईल अशी शक्यता आहे; पण तरीही नेहमीपेक्षा महाविद्यालयांच्या परीक्षा थोड्या उशिरा सुरू होणार आहेत, हे तथ्यही लक्षात घ्यायला हवे. बारावीनंतरच्या शैक्षणिक प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याने आणि या प्रवेश परीक्षा येत्या महिनाभराच्या कालावधीत होणार असल्याने त्यानंतरच महाविद्यालयीन शिक्षणाला चालना मिळणार आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाविद्यालये सुरू केले जातात. या वेळी जर प्रवेश परीक्षांचे नियोजन व्यवस्थित झाले आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या तर ऑगस्टच्या पहिला आठवड्यात महाविद्यालयीन शिक्षण सुरू होण्यास काहीच हरकत नाही. तसे झाले तर शिक्षण व्यवस्था मार्गी लागण्यास आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे.
मागील दोन वर्षांच्या कालावधीत महामारीचा सर्वात जास्त फटका शिक्षण क्षेत्रालाच बसला होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थित होत नव्हत्या, त्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळत नव्हते, ऑनलाइन शिक्षणावर आणि ऑनलाइन परीक्षांवर सर्व भर होता, त्याचे समाधान शिक्षकांनाही नव्हते, पालकांनाही नव्हते आणि विद्यार्थ्यांनाही मिळत नव्हते. ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षांची सवय लागलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्या परिस्थितीशी जमवून घेण्यामध्ये अडचणी येणार असल्या, तरी या निमित्ताने शैक्षणिक व्यवस्था मार्गी लागणार आहे आणि त्याचा फायदा शेवटी विद्यार्थ्यांना होणार आहे.