नवी मुंबई – खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला व्यवस्थापकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत माहिती अधिकारातून हा खुलासा समोर आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली होती.
सांगली येथील सुयोग ओंधकर यांनी माहिती अधिकारात खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला व्यवस्थापकांनी महापालिकेची परवानगी घेतली होती की नव्हती, या संदर्भात माहिती मागविली होती. यानंतर पनवेल महापालिकेकडून सदर कार्यक्रमाच्या परवानगीच्या कागदपत्राची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले.
थोडक्यात व्यवस्थापकांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला असता तर त्याची माहिती मिळाली असती. परंतु सध्या महापालिकेकडे या संदर्भात कोणतीही माहिती नाही. खारघरमधील सेंट्रल पार्क येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात लाखोंच्या संख्येने अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे श्रीसदस्य जमा झाले होते.
हा पुरस्कार सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडला होता. या सोहळ्याला अंदाजे 20 लाख लोकांनी उपस्थिती लावली होती. यापैकी अनेक जण आदल्या रात्रीपासून तर काही जण एक दिवस आधीच त्या मैदानात दाखल झाले होते.
कार्यक्रम सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू असल्याने प्रचंड उष्माघातामुळे उपस्थितांमधील अनेकांना त्रास झाला, ज्यात 14 जणांचा मृत्य झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने संबंधित श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली.
मात्र यादुर्घटनेस जबाबदार कोण? असा सवाल विरोधी पक्षाकडून उपस्थित केला गेला होता. याशिवाय या कार्यक्रमासाठी अंदाजे 14 कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचा आरोपही होत आहे.