नगर -शासनाने संचारबंदीत शिथिलता केल्याने, लॉकडाऊन मध्ये अडकलेले भाविक, विद्यार्थी, कामगार यांना आपआपल्या गावी जाण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी खास रेल्वे गाड्या व बसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. नगरमध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मदरसात आलेल्या मुलांना शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या सहकार्याने बिहार कडे रेल्वेने रवाना करण्यात आले.
नगरमधील मुकुंदनगर भागातील रजा-ए-महेबुब मदरसा व बक्कर कसाब मदराशात देशातील विविध राज्यातील मुले धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आली होती. परंतु लॉकडाऊनमुळे तीही येथे अडकून पडली होती. याबाबत संस्था चालकांनी शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याशी संपर्क साधून या मुलांना आपल्या गावी जाण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. बाळासाहेब बोराटे यांनी तात्काळ मनपा आयुक्तांशी याबाबत चर्चा करुन या मुलांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी मिळविली. त्यानंतर त्यांची ऑनलाईन कागदपत्रे, वैद्यकीय तपासणी, रेल्वेची व्यवस्था आदिंची पूर्तता करुन 104 विद्यार्थी व इतर 67 नागरिकांना बिहारकडे रवाना केले.
यासाठी विशाल वालकर, राजू धुळेकर, तारीक कुरेशी, असिफ पटवेकर, अशपाक, मुश्ताक भाई, हाजी बाबर, नदीम शेख, अब्दुल कादीर, सय्यद साबीर अली, शेख अहसान, हाजी मिर्जा, शंकर मिसाळ, लांडगे, रफिकभाई आदिंचे सहकार्य मिळाले. यावेळी बोराटे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून वाढत चाललेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या अडचणीत भर पडत आहे. प्रशासन व सामाजिक संस्थांच्यावतीने त्यांना दिलासा देण्याचे काम होते आहे. यासाठी प्रशासन व मित्र परिवाराचे सहकार्य मिळत आहे. घरी जाणाऱ्या कामगार व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आपणास प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.