दुबई – मुंबई इंडियन्स संघासाठी सातत्याने प्रार्थना करत असलेल्या व संघासाठी अत्यंत लकी ठरत असलेल्या आजी अमिरातीत दाखल झाल्या असून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी त्या उपस्थित राहणार आहेत.
2017 सालच्या आयपीएल स्पर्धेपासूनच मुुंबईच्या प्रत्येक सामन्यासाठी त्या स्टॅण्डमध्ये बसलेल्या दिसून आल्या आहेत. तसेच त्या मुंबई संघासाठी हाती कोणती तरी पोथी घेत प्रार्थनाही करताना अनेकदा दिसलेल्या आहेत. त्यांच्या प्रार्थनेच्या पाठिंब्यामुळेच संघ यशस्वी होतो, अशी अतिशयुक्तीही केली जात आहे.
मुंबई संघाचे व्यवस्थापन व खेळाडू देखील त्यांना आपल्या विजयासाठी अत्यंत लकी समजतात. त्यांचे दर्शन दिल्ली विरुद्धच्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात झाले व मुंबईच्या खेळाडूंनी आनंदही व्यक्त केला होता.
या आजी म्हणजेच पौर्णिमा दलाल आहेत. त्या मुंबई संघाच्या मालकीण नीता अंबानी यांच्या त्या मातोश्री आहेत. या आजी मुंबईच्या ज्या सामन्यासाठी उपस्थित राहतात त्या सामन्यात संघ जिंकतो, अशी चाहत्यांची धारणा आहे. त्यामुळे दिल्ली विरुद्धच्या सामन्यात त्यांचे दर्शन झाल्यावर लगेचच संघ जिंकणार अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता त्यांच्या प्रार्थनेमुळे संघ हा सामना जिंकला का खेळाडूंच्या कामगिरीमुळे हा भाग अलाहिदा पण त्यांच्या उपस्थितीने संघाचे मनोधैर्य वाटते हे निश्चित मानले जात आहे.