- टोलवाटोलवी संपता संपेना : आमदार सुनील शेळके यांचे बाळा भेगडे यांना पत्र
- “हिशोबा’बरोबरच वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याची दाखविली तयारी
- रखडलेल्या कामांची गावनिहाय यादीसाठी केला “पत्रप्रपंच’
– रोहिदास होले
पिंपरी – आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली; गेली 25 वर्षे तळागाळापर्यंत रुजलेल्या भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे उखडून टाकण्याचे मनसुबे आमदार सुनील शेळके यांनी बोलून दाखविले. सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरू असतानाच मावळात विकासकामांवरून कोट्यवधींच्या “गावगप्पा’ रंगल्या आहेत. त्यात आणखी भर पडली ती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यामुळे. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या कार्यकाळात “काही कामे झालीच नाहीत तरी बिले निघाली’, अशा आरोपांचे “बाण’ आमदार शेळके यांनी सोडले. त्यामुळे विकासकामांवरून रंगलेल्या राजकीय आखाड्यात मावळातील आजी-माजी आमदारांना चांगला “स्टडी’ करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
करोना महामारीनंतर शाळा, महाविद्यालयांचे दरवाजे बंद झाले. सर्वत्र “ऑनलाइन’ शिकवणीचे पाठ गिरविले जात असतानाच मावळातील विकास कामांवरून सुरू असलेली “शाळा’ बंद कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांचे “फटाके’ फोडले जात आहेत. एवढंच नाही तर आठवड्याभरापूर्वी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची विकास कामांचा “अभ्यास’ करण्याची “ऑफर’ आमदार शेळके यांनी स्वीकारली आणि थेट पत्रप्रपंच करीत अभ्यासाची तयारी दर्शविली. त्यामुळे आता आजी-माजी आमदारांमधील टिपेला पोहोचलेला सुप्त संघर्ष लपून राहिलेले नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला 57 पैकी 50 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा करावी लागेल. कारण गेली 25 वर्षे भाजपच्या मुशीत तयार झालेले तळागाळातील कार्यकर्ते एकदम राष्ट्रवादीकडे वळवायचे “शिवधनुष्य’ पेलण्याचे धारिष्ठ्य आमदार शेळके अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसला करावे लागणार आहे. गावगाड्यातील निवडणुकींची रणधुमाळी संपल्यानंतर पुढील दोन वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकींचा “बार’ उडणार आहेत. भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे आजी-माजी आमदारांमधील विकासकामांवरून सुरू झालेली “लढाई’ थांबेल की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
कोट्यवधींच्या विकासकामांवरून मावळातील राजकारण आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे 1642.92 कोटींची विकासकामे केल्याचा ठाम विश्वास आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना 700 कोटींच्याही विकासकामांचा ताळमेळ बसत नसल्याचे सांगत आरोप डागले आहेत. त्यामुळे आजी-माजींमधील ही टोलवाटोलवी राजकीय असली तरी याबाबतचे सखोल मंथन सर्वांनीच करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे संभ्रमावस्था निर्माण झालेल्या मावळातील जनतेने खऱ्या अर्थाने आणि डोळसपणे विकासकामांचा “अभ्यास’ करण्याची हीच ती वेळ आहे, हे देखील अधोरेखीत झाले आहे.
भाजप बंडखाेर पराभूत…
मावळात आजी-माजी आमदारांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू असतानाच मागील आठवड्यात लोणावळा नगरपरिषदेच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपपासून फारकत घेतलेल्या उमेदवाराचा पराभव चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सुधीर शिर्के विजयी झाले आहेत. दरम्यान, चार वर्षांपूर्वी लोणावळा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगरपरिषदेत भाजप, कॉंग्रेस, आरपीआय आणि अपक्ष यांनी एकत्र येत आघाडी तयार केली होती. याचवेळी शिवसेना आणि काही अपक्ष यांनी विरोधी बाकावर बसणे पसंद केले. दरम्यानच्या काळात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेदातून चार नगरसेवक विरोधात गेले. त्या नगरसेवकांनी उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत बंडाचे निशाण फडकविले.
गावपुढाऱ्यांची नेत्यांकडील उठबस वाढली
करोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील चौकात, गल्लीत गप्पांचे फड हे चौकांऐवजी आता सोशल मीडियावर अधिक रंगत आहेत. दरवेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. भाऊबंदकी, आप्तेष्टांच्या “ऑनलाइन’ किंवा प्रत्यक्ष बैठका करूनच उमेदवारी ठरेल, हे ही तितकेच खरे आहे. करोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते. मुदत संपलेल्या 57 ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केल्याने गावचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात काळजी घेत निवडणुका घेवून ग्रामपंचायतीला नवीन कारभारी देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. तर गावपुढाऱ्यांची पक्षीय पातळीवरील नेत्यांकडील उठबस वाढली असल्याचे चित्र आहे.