मंचर – सध्या पुणे जिल्ह्यात काही भागांत पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरण साठ्यात अत्यल्प पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्वच धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा असल्यानेंयंदा धरणे भरणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, शेतकरी चिंतेत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणारी आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील धरणे आणि या धरणात साठणारे पाणी यावर आंबेगाव-जुन्नर तालुक्याबरोबरच शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा या तालुक्यांचा ही समावेश होतो. कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, वडज, माणिक डोह, पिंपळगाव जोगा या धरणांचा समावेश होतो. मागील वर्षी या धरणांमध्ये 4 जुलैला 71.31 टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र यावर्षी या धरणांमध्ये 63.11 टक्केच पाणीसाठा आहे, त्यामुळे येणाऱ्या कालखंडात पाऊस किती होतो आणि धरणे किती भरतात यावरच पुढील पाण्याची नियोजन ठरणार आहे.
नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी व येथील शेती यावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा असणारा कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे, तर काही ठिकाणी शेती ओली करून पेरण्या करण्यात आल्या आहेत.
एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहता दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे समोर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात तरकारी पिके, पालेभाज्या, ऊस व जनावरांची चारा ही पिके घेतली जातात; परंतु पावसाने दडी मारल्याने सध्या पिकांनाही पाणीचा प्रश्न जाणवू लागला आहे. पाण्याचे स्रोतही आटले असून पिकांना पाणी कुठून द्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.