वितरिकेला पाणी सोडा : मतदानावर बहिष्काराचा निर्णय
यवत – दौंड तालुक्यातील पाटस येथील वितरिकांना तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पाटस येथील शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. पाटसमधील वितरिका क्रमांक 27 ला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे.
पाटसमधील 27 नंबर वितरिकेला पाणी न आल्याने कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने यावर्षी तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाटस परिसरातील विहिरी, बोअरवेल्स कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिके जळून चालली आहेत. हाता तोंडाशी आलेली पिके तीव्र उन्हाळ्यामुळे जळून जाताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पाटस येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी या अगोदर देखील (दि.19) रोजी पाटस येथील पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वितरिकेला पाणी सोडण्याची मागणी केली होती. परंतु अद्याप वितरिकेला पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे (दि.22) पुन्हा एकदा पाटसमधील शेतकरी एकत्र जमले. त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत पाणी पाटस येथील वितरिका क्रमांक 27 ला पाणी सोडण्याची मागणी केली.
यावेळी पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता एस. एम. साळुंके, पाटस येथील शाखा अभियंता उत्कर्ष पाटील, संभाजी देशमुख, रमेश जाधव, नितीन शितोळे, भरत आव्हाड, बाप्पू शितोळे, राजाराम वणवे, शिवाजी देशमुख, एकनाथ येवले, विजय बोरावके, गणेश देशमुख, प्रकाश शितोळे, शरद कामठे, धोंडिबा दिवेकर, बाळू शितोळे, मंगेश वणवे, सुखदेव शिंदे यांसह शेतकरी उपस्थित होते.
मतदानावर बहिष्कार टाकणार
पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष्यांचा प्रचार करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
शेतातील पिके जळून गेली आहेत. लोकांना पिण्यासाठी देखील पाण्याची टंचाई आहे. जोपर्यंत 27 नंबर फाट्याला पाणी येत नाही. तोपर्यंत मतदानावरती बहिष्कार असणार आहे.
– संभाजी देशमुख, शेतकरी.