हून यांच्याच नेतृत्वाखाली सियाचिनवर फडकला होता तिरंगा
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल आणि ऑपरेशन मेघदूतचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून (पीएन हून) यांचे आज निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी पंचकुला येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. युद्धभुमीवरील जगातील सर्वांत उंच अंतरावर असलेल्या सियाचिनवर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम भारतीय लष्कराने त्यांच्याच नेतृत्वाखाली केला होता. 1987 मध्ये लेफ्टनंट जनरल हून पश्चिम कमांडचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
ऑपरेशन मेघदूत जनरल हून यांची कारकीर्दीतील सर्वांत मोठी कामगिरी होती. त्यांनी अनेक मोहिमा आणि युद्धातही महत्त्वाची भूमिका निभावली होती. 1984 मध्ये पाकिस्तान युद्धातही त्यांनी साहस दाखवले होते. ऑपरेशन मेघदूतच्या यशस्वी नेतृत्वामुळे ते देशाचे नायक बनले होते. निवृत्तीनंतर 2013 मध्ये जनरल हून यांनी भाजपत प्रवेश केला होता. पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये जनरल हून यांचा जन्म झाला. पण फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात आले होते.
जनरल हून यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने सियाचिनच्या शिखरावर तिरंगा फडकवला होता. या मोहिमेला ऑपरेशन मेघदूतचे नाव देण्यात आले होते. 1980 च्या दशकात पाकिस्तानने सियाचिनकडे आपले सैनिक पाठवण्यास सुरुवात केली होती. सियाचिनवर कब्जा मिळवण्याचा पाकचा प्रयत्न होता. पाकचा हा डाव धुळीस मिळवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूत मोहीम राबवली होती.