मनोबल वाढविण्यावर भर : जिल्हाभर समुपदेशक गटाचा “पॉझिटिव्ह’ उपक्रम
गटातील 40 समुपदेशक दिवसभर मोबाइलवरून साधताहेत संवाद
पिंपरी – राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूने बाधित रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये या आजाराने चांगलीच धास्ती भरली आहे. अनेकांच्या मनामध्ये नानाविध प्रश्नांनी घर केले आहे. या आजाराशी निगडित असलेल्या प्रश्नांचे काहूर नागरिकांच्या मनामध्ये उठले आहे. हा आजार मला होणार, तर नाही ना, “सोशल डिस्टंसिंग’ म्हणजे नेमके काय, आयसोलेशन, होम क्वांरटाइन म्हणजे काय, हा आजार अधिक कोणाला होतो, अशा नानाविध प्रश्नांनी नागरिकांच्या घरामध्ये घर केले आहे. यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव निर्माण झाला आहे. त्यांचा हा तणाव दूर करण्याचा विडा मनोबल समुपदेशक गटाने घेतला आहे.
संपूर्ण जगभर करोनाने धूमाकूळ घातला आहे. त्याबाबतचे वृत्त सतत सुरू आहेत. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्रामध्येही या रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पीक जोरात आले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच काही जणांना परिस्थितीमुळे एकटे राहण्याची वेळ आली आहे. याचे शारिरीक परिणाम आहेतच. त्यासोबतच मानसिक ताण-तणाव देखील यामुळे वाढत आहे. हा तणाव मानसोपचार तज्ज्ञांसोबत “शेअरिंग’च्या माध्यमातून फोनवर संपर्क साधून संवादाच्या माध्यमातून सोडवता यावा यासाठी मनोबल गटाने प्रयत्न सुरू केले आहे. या गटातील 40 समुपदेशक दिवसभर विविध वेळांमध्ये फोनवर संवाद साधत आहेत.
तुमची भीती, मनातील निराशा, अस्वस्थता समजून घेण्यासाठी आम्ही आहोत असे हे समुपदेशक सांगत आहेत. या भीतीच्या वातावरणामध्ये तुम्हाला मन मोकळे करण्याची आवश्यकता वाटली, तर फोनद्वारे संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही. संवाद अधिकाधिक अर्ध्या तासाचा होऊ शकतो. तसेच माहिती गोपनीय ठेवण्याचे आश्वासन या ग्रुपने दिले आहे.
“झाले मोकळे आकाश’
करोनाच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ताण-तणाव निर्माण झाला आहे. ही सेवा त्यांचा तणाव दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक या करोनामुळे घाबरुन गेले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक फोन करून विचारत आहेत. आम्ही काय काळजी घेतली पाहिजे. आम्हाला हा आजार झाला तर काय करायचे असे प्रश्न ते विचारत आहेत. करोनाच्या लक्षणांना घाबरुन मानसिक भीतीवर उपचार शोधणाऱ्यांना आम्ही मदत करत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांमधून फोन आले आहेत. भीती घालविण्यासाठी करण्याचे उपाय, पुस्तकांची यादी सुचविणे, ध्यानधारणा, व्यायाम, सकारात्मक विचार ठेवण्यासाठी काही उपाय आम्ही त्यांना सुचवत आहोत असे समुपदेशक स्मिता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
समस्या तुमची, उत्तर आमचं…
स्मिता कुलकर्णी
9822752056
मोहन निंबाळकर
9766444469
मेघना काळे
9309918275
लातूरमधील सन 1993 च्या भूकंपावेळी मी समुपदेशनाचे काम केले आहे. त्यामुळे आपत्ती निवारणामध्ये समुपदेशन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये 20 पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये पन्नाशीत असलेल्या गृहिणी व तरुण विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना विविध उपाययोजना करण्यास सांगून धीर देत आहे. तसेच वाचन, व्यायाम, योगासने यांची आवड कशी निर्माण होईल, याबाबत मार्गदर्शन करत आहोत. त्यांचा नंतर “फॉलोअप’ही घेण्यात येत आहे. फोन करणाऱ्या नागरिकांची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे मनामध्ये काहीही भीती अथवा एकटेपणा वाटत असेल, तर नागरिकांनी मनमोकळेपणाने फोन करावा.
– स्मिता कुलकर्णी, समुपदेशक.