मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता शिवसेनेच्या शिंदे गटाता नाराजी सूर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेदरम्यान शिंदे गटातील नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेले सूचक वक्तव्य केले आहे त्यामुळे शिंदे गटात सध्या नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे सांगितले जात आहे. शिंदे गटातील बरेच आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. यादरम्यान अचानक अजित पवारांनी बंड केले. एवढंच नाही तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देखील मिळाले. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
यादरम्यान गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यात काल झालेल्या राजकीय भूकंपाची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती. वरिष्ठांनी बोलून निर्णय घेतला आहे. त्यात आम्ही काय बोलणार असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच घरातल्या लोकांना कायम शेवटच्या पंगतीत जागा मिळते. आपल्या आमदारांचा लवकरच शपथविधी होईल, असे सूचक विधान देखील गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात कालचा रविवार हा महाभूकंपाचा ठरला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत शिंदे-भाजप सरकारला साथ दिली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार देखील सरकारमध्ये सामील झाले.