दिल्ली – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात ही परंपरा कधीच नव्हती.आज मी ऑन कॅमेरा सांगतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. एकनाथ शिंदेंना हटवलं जाणार आहे. अपात्रतेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार आहेत. म्हणून अजित पवारांना घाईगडबडीत सोबत घेतलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहेत.” महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर आहे, आमच्यासोबत राहील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
मोदी-शाहांचं हे देणं
“देशाच्या राजकारणाला मोदी-शाहांचं हे देणं आहे. आयाराम-गयारामचं हे नवीन राजकारण आहे. पण जनता अद्दल घडवेल. सगळ्यांना माहिती आहे काय चाललं आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले होते. हे सगळं ईडीचं राजकारण आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स दोन तासांसाठी आमच्या हातात द्या. आम्हीही महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण बदलून टाकू”, असा दावा संजय राऊतांनी केला.
….त्यामुळे भाजपने फोडाफोडी केली
“अजित पवार तुरुंगात खडी फोडतील. भुजबळ खडी फोडतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. आता खडी कोण फोडत आहे? देशाच्या राजकारणातील हा गलिच्छ प्रकार आहे. शिंदे अपात्र होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपने फोडाफोडी केली आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी त्यांनी केली.