मुंबई : राज्याच्या राजकारणात काल अनपेक्षित घटना घडली आणि अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी ८ राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर आता भाजपकडून आणखी एक मोठा दावा करण्यात येत आहे.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठा दावा करत अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील, असे म्हटले आहे. त्यासोबतच कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा, असे सूचक वक्तव्य महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडणार का असा सवाल निर्माण केला जात आहे.
गिरीश महाजन या सर्व घडामोडीवर बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचे स्वागत आहे. देशाचे नेतृत्व फक्त मोदी करू शकतात हे त्यांना मान्य आहे. अजून छोटे मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा. अजून बरेच लोक येणार आहेत, उद्धव ठाकरेच काय अजून कोण कोण एकट पडतं ते पहाच असा इशारा महाजन यांनी दिला आहे.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही येणाऱ्या काही दिवसांत लवकरच होईल, असेही महाजन म्हणाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तोच अजित पवारांनी ८ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.