अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, संपूर्ण गावाचे स्थलांतर
नागठाणे – नागठाण्याच्या पश्चिम भागात डोंगर उंचावर असलेल्या टोळेवाडी (भैरवगड, ता. सातारा) येथे अतिवृष्टीमुळे जमीन मंगळवारी पहाटेच्यावेळी जमीन खचल्याची घटना घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. आ. बाळासाहेब पाटील यांनी गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
नागठाण्याच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरावर भैरवगड ग्रामपंचायत आहे. त्यात टोळेवाडी, पिरेवाडी, गवळणवाडी, मानेवाडी या वाड्यांचा समावेश आहे. त्यातील टोळेवाडीत जमीन खचण्याचा प्रकार घडला. या ठिकाणी सुमारे 850 च्या सुमारास लोकसंख्या व 80 ते 90 घरे आहेत. त्यातील बहुतेक नव्या व जुन्या घरांना भेगा पडल्या आहेत. तर काही घरांमधून जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. काही घरात पाणी येण्याचे प्रकार घडले आहेत. बऱ्याच घरांचे भिंती पडल्या आहेत. मांडवेतून पुन्हा आसनगावडे येणाऱ्या रस्त्यालाही मोठ्या भेगा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यालगतची, शेतातील जमीन खचली आहे.
याबाबतची माहिती मिळताच आ. बाळासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्या माधवी गुरव, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर, बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. चंद्रकांत माळी यांनी टोळेवाडीस भेट देऊन परिस्थितीची पाहाणी केली. तलाठी राम कुंभार, ग्रामसेवक नीलेश गुरव, सरपंच रामचंद्र साळुंखे हेदेखील दिवसभर परिस्थिवर लक्ष ठेवून होते. पंचनामा, नुकसानीचे कामही सुरू होते.