मुंबई -शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेकांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.
त्यातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमोल कोल्हेंचा हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले, अमोल कोल्हे आता कलाकार नाहीत तर लोकप्रतिनिधी आहेत. गोडसे विचाराला ताकद मिळणे म्हणजे देशविघातक विचारांना ताकद मिळण्यासारखे आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला कोणीही ताकद देवू नये, त्यांना हिरो बनवू नये.
या देशाला गांधी विचारच तारू शकतात. याच विचारांवर देश महासत्ता होवू शकतो. त्यामुळे या वादात शरद पवारांनी यात लक्ष घालावे. जर चित्रपट प्रदर्शित झाला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका दिसून येईल, असेही पटोले म्हणाले.