मी नवा प्रकाश दाखवू शकणार नाही!
मुंबई, दि. 21 – जरी “प्रकाश’ हा माझ्या नावाचा भाग असला, तरी मी तुम्हाला नवा प्रकाश देऊ शकण्यास असमर्थ आहे, असे उद्गार जयप्रकाश नारायण यांनी महिलांच्या एका सभेत काढले. ते म्हणाले, बहुधा दररोज मला दोन सभांतून भाषणे करावी लागतात. त्यात मला नवीन गोष्टी सांगता येत नाहीत जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हाच नवीन काही सांगता येईल. “जयप्रकाशजींनी प्रकाश दाखवावा’ अशी सूचना लेखिका मालतीबाई बेडेकर यांनी केली होती.
अविकसित राष्ट्रांनी आपला संघ स्थापावा
मुंबई – टान्झानियाचे पंतप्रधान रशिदी कवावा यांनी असे सुचविले की, विकसनशील राष्ट्रांनी आपले महत्त्वाचे हित संबंध रक्षणासाठी आपला एक संघ स्थापन करावा. कारण विकसित राष्ट्रे अविकसित राष्ट्रांचे रक्तशोषण करण्यास टपलेली आहेत. याकामी भारताने पुढाकार घ्यावा व असा संघ स्थापन करावा.
आठ वर्षांनंतर उद्यान खुले
पुणे – महापालिकेने तयार केलेले परंतु 8 वर्षे बंद असलेले उद्यान येत्या 26 जानेवारी रोजी महापौर भाई वैद्य नागरिकांसाठी खुले करणार आहेत. मनपा आयुक्तांचे बंगल्याशेजारील असलेली “चित्तरंजन वाटिका’ महापालिकेने 8 वर्षांपूर्वी बांधली; परंतु नागरिकांना मात्र तिचा उपयोग होत नव्हता. महापौरांनी याबाबत लक्ष घालून हे उद्यान 26 रोजी आपण स्वतःच जनतेसाठी खुले करू, अशी संबंधित अधिकाऱ्यांना समज दिली आहे. ही समज मिळताच उद्यानाची साफसफाई व प्रारंभिक गोष्टी पुऱ्या झाल्या हे विशेष!
भारताकडे अणुसाहित्य निर्यातीस बंदी
ओटावा – कॅनेडियन सरकारच्या उद्योग व व्यापार खात्याने असे जाहीर केले आहे की, भारताकडे अणुशक्ती संशोधनाचे साहित्य निर्यात करण्यात येणार नाही. अर्थात, ही बंदी औपचारिक आहे. कारण गेल्या मे महिन्यात भारताने जेव्हा अणुस्फोट केला तेव्हापासून भारताकडे अणुसाहित्य रवाना करणे थांबविण्यात आलेच होते.