मुंबई : राज्यात काही महिन्यापूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि राज्यातील राजकीय वातावरणच बदलून गेले. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. बंडखोरीची शिंदे गटातील नेत्यांना खोक्यांचे आमिष दाखवले गेले असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात यर्त आहे. या सर्व घडामोडीत आता भाजपच्या एका नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी जवळपास १०० फोन केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांचा भास्कर जाधवांवर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी भास्कर जाधवांना आपल्या गटात सामावून घेतलं नाही, असा खुलासादेखील यावेळी मोहित कंबोज यांनी केला. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करत हा आरोप केला आहे.
खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे !@_BhaskarJadhav की सचाई ! pic.twitter.com/rraB413XC2
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) February 27, 2023
संबंधित व्हिडीओत मोहित कंबोज म्हणाले, “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान १०० वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचे निवेदन दिले होते. पण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार भास्कर जाधवांना आपल्या समवेत घेण्यास राजी नव्हते.
“कारण प्रत्येकाला वाटत होतं, की भास्कर जाधवांवर विश्वास ठेवू शकत नाही. आज भास्कर जाधव जेवढी बडबड करत आहेत. पण त्यावेळी ते तिकीट काढून गुवाहाटीला येण्यास निघाले होते. जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या बाहेर बसणार, असं भास्कर जाधव म्हणत होते. त्यांच्याबरोबर दुसरे नेते सुनील राऊतही होते,” असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला आहे.